अजित पवार यांची तीन राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाची गडकरींकडे मागणी
अजित पवार यांची तीन राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाची गडकरींकडे मागणी
पुणे वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नितीन गडकरींकडे तीन राष्ट्रीय महामार्गांच्या तातडीच्या रुंदीकरणाची मागणी. जाणून घ्या संपूर्ण तपशील.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : पुण्यात वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची गांभीर्यपूर्ण भूमिका; तीन राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणाची केंद्र सरकारकडे मागणी
पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा पाऊल उचलले आहे. त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून पुण्यातून जाणाऱ्या तीन महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गांचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 60 (नाशिक फाटा ते खेड), महामार्ग क्र. 65 (हडपसर ते यवत) आणि महामार्ग क्र. 548D (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तीन मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रकल्प, रुग्णालये आणि वसाहतींमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
अजित पवारांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 60 आणि 65 हे चार लेनचे असून त्यांना सहा लेनमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. तसेच 548D मार्ग केवळ दोन लेनचा असून त्याचे सहा लेनमध्ये रूपांतर तातडीने करावे लागेल. यामुळे केवळ वाहतूक सुरळीत होणार नाही, तर भविष्यातील एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पांसाठीही पर्यायी मार्ग तयार होईल. हे रस्ते पुणे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांशी जोडलेले असल्याने बाहेरून येणारी वाहने शहरात प्रवेश करताना मोठी कोंडी निर्माण करतात. परिणामी, या मार्गांवरील प्रवास वेळ वाढतो, अपघाताचे प्रमाण वाढते आणि नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील प्रस्तावित एलिव्हेटेड हायवेच्या निविदा प्रक्रियेदरम्यान या रुंदीकरणाच्या कामाचा तात्पुरता पर्यायी उपयोग होईल, असेही अजित पवार यांनी नमूद केले आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे तातडीने निधी आणि प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून या प्रकल्पांना गती मिळून पुणे औद्योगिक व नागरी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल.
या पत्राच्या अनुषंगाने अजित पवारांनी राज्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना विकासकामांमध्ये विलंब टाळण्याच्या सूचना देखील दिल्या. त्यांनी स्पष्ट केले की, वेळेत काम पूर्ण न झाल्यास प्रकल्पांच्या किंमती वाढतात आणि राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक विभागाने समन्वय साधून नियोजित वेळेत प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा. तसेच, पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य ते सहकार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.