पुणे गुन्हा: कात्रजमधून चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी नेले; ५ आरोपी अटकेत
पुण्यातून पाच वर्षीय चिमुरडीचं अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांकडून अटक
पुण्यातील कात्रजमधून ५ वर्षीय चिमुरडीचं अपहरण करून भीक मागायला लावणाऱ्या पाच आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही तपासातून आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना तुळजापूर येथे पकडलं. सविस्तर
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : पुण्यातून पाच वर्षीय चिमुरडीचं अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांकडून अटक; 140 CCTV फुटेजच्या मदतीने आरोपी गजाआड.
पुणे शहरातून एका पाच वर्षीय चिमुरडीचं अपहरण करून तिला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज परिसरातून अपहरण झालेल्या मुलीचा तपास करताना तब्बल 140 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींपर्यंत पोहोचले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये कौतुकाची लाट पसरली आहे.
25 जुलै रोजी कात्रज परिसरातून एक चिमुरडी बेपत्ता झाली होती. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि शहरातील विविध भागांतील CCTV फुटेजची बारकाईने पाहणी केली. या तपासातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण धाग्यांच्या आधारे आरोपींना शोधून काढण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत – सुनील सिताराम भोसले (वय ५१), शंकर उजण्या पवार (वय ५०), शालुबाई प्रकाश काळे (वय ४५), गणेश बाबू पवार (वय ३५) आणि मंगल हरफुल काळे (वय १९). हे सर्व आरोपी मोतीझारा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील रहिवासी आहेत. यामध्ये एका महिलेसह एकूण पाच आरोपींचा समावेश असून त्यांनी ही चिमुरडी पुण्यातून अपहरण केल्याचे समोर आले आहे.
या आरोपींनी पुण्यात येऊन चिमुरडीला फसवून तिचं अपहरण केलं आणि भीक मागण्यासाठी जबरदस्तीने तिला विविध भागात नेलं. सुदैवाने, पोलिसांच्या तत्परतेमुळे चिमुरडीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे आणि तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. पोलिसांच्या या सतर्क आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे एक मोठा अनैतिक प्रकार रोखला गेला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींविरोधात संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.