आडस शेतकऱ्यांचा पाण्याच्या टाकीवरून आंदोलनाचा इशारा | रस्त्याचा संघर्ष तिसऱ्या वर्षात
शेतकऱ्यांचा पाण्याच्या टाकीवरून आंदोलनाचा इशारा: आडस येथील रस्ता संघर्ष पुन्हा पेटणार!
आडस येथील शेतकऱ्यांचा रस्त्यासाठी तीन वर्षांपासूनचा संघर्ष आता टोकाला; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा इशारा!
सायली मेमाणे
पुणे ३१ जुलै २०२५ : केज तालुक्यातील आडस येथील शेतकऱ्यांचा तीन वर्षांपासून सुरू असलेला रस्त्याचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शेतजमिनीपर्यंत जाणारा नकाशावर स्पष्ट असलेला ३३ फूट रुंदीचा रस्ता अडवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पोहोचता येत नाही. या अन्यायाविरोधात आता शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शेतकरी दशरथ योगीराज आकुसकर आणि इतर तक्रारदारांनी पाण्याच्या टाकीवरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही कारवाई न करता केवळ लेखी आदेश देऊन वेळ मारून नेली आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी संतप्त
दि. ३० जुलै रोजी तहसीलदारांनी तलाठी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कारवाईसाठी आदेश दिले होते. त्या वेळी मंडळ अधिकारी संतोष देशमुख व तलाठी श्रीमती. चव्हाण हे उपस्थित होते; मात्र पोलीस आणि भूमी अभिलेख कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने प्रत्यक्षात रस्ता मोकळा करण्याची कारवाई पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.
❝फक्त आदेश, अंमलबजावणी नाही❞
शेतकऱ्यांच्या मते, प्रशासन केवळ आदेश काढून आपली जबाबदारी पूर्ण समजते. प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आता त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करायचा निर्णय घेतला आहे.
चार गुन्हे दाखल, शेती पडीक
या रस्ता वादातून आत्तापर्यंत चार परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे. रस्ता बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पडीक पडली आहे आणि त्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जलतरण टाकीवरून आंदोलन करत प्रशासनाला जागं करण्याचा निर्धार केला आहे.
📢 प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास या आंदोलनाची तीव्रता वाढू शकते आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.