मल्हार गडावर बेशिस्त पर्यटकाला जागरूक नागरिकाने दिला दणका
मल्हार गडावर बेशिस्त पर्यटकाला जागरूक नागरिकाने दिला दणका
मल्हार गडावर एका व्यक्तीने मुख्य दरवाजावर हुक्का ओढल्याने जागरूक नागरिकाने त्याला धडा शिकवला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांच्या पवित्रतेबाबत जनजागृतीचा संदेश देतो.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : पुण्याजवळील प्रसिद्ध मल्हार गडावर एक जागरूक नागरिकाने दाखवलेली शिस्तीची जाणीव आणि ऐतिहासिक वारशाबद्दलचा आदर, सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. महाराष्ट्रातील गड-किल्ले हे केवळ पर्यटन स्थळ नसून आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. मात्र, या पवित्र स्थळांचा अपमान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशीच एक घटना मल्हार गडावर घडली, जिथे एका व्यक्तीने गडाच्या मुख्य दरवाजावर बसून हुक्का ओढण्याचा धाडसी प्रकार केला. हे पाहून एका जागरूक नागरिकाने त्याला नम्रपणे समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या व्यक्तीने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर नागरिकाने कठोर पाऊल उचलत हुक्काचाच चक्काचूर केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या नागरिकाचं कौतुक केलं आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या पावित्र्याच्या प्रश्नावर लक्ष वेधलं गेलं आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात, पण काही जण दारू पिणं, हुक्का ओढणं, अस्वच्छता पसरवणं यासारखी बेशिस्त वर्तन करतात. अशा वागणुकीमुळे या ऐतिहासिक वारशाचा अपमान होतो आणि इतर पर्यटकांसाठीही हा एक वाईट अनुभव ठरतो. गड-किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांचं महत्त्व लक्षात घेता, हे स्थळ केवळ मजा करण्याचे नाहीत तर अभिमानाने नमन करण्यासारखी ठिकाणं आहेत.
सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेमुळे पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे – गड-किल्ल्यांच्या पवित्रतेचं रक्षण कोण करणार? अनेकजण आता या ठिकाणी कडक नियमावली लागू करण्याची आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. गड-किल्ल्यांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती, सीसीटीव्ही देखरेख, आणि पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक उभारणे ही काही प्राथमिक पावले असू शकतात.
या घटनेने हे स्पष्ट केलंय की, गड-किल्ल्यांची शिस्त राखणं ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही नैतिक जबाबदारी आहे. जर प्रत्येकाने अशा जागांवर योग्य वागणूक ठेवली, तरच आपण आपल्या वारशाचं जतन करू शकतो. जागरूक नागरिकाची कृती इतरांना शिकवण देणारी आहे – इतिहासावर प्रेम करताना फक्त फोटो काढून व्हायरल होण्यापेक्षा, अशा वर्तनाचा प्रतिकार करून खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं हेच खरं देशप्रेम आहे.