मुद्रांक शुल्क परताव्यात मोठा बदल: आता केवळ 15 दिवसांत मिळणार परतावा
मुद्रांक शुल्क परताव्यात मोठा बदल: आता केवळ 15 दिवसांत मिळणार परतावा
नोंदणी व मुद्रांक शुल्क परतावा मिळण्यासाठी आधी लागणारा महिन्यांचा कालावधी आता फक्त 15 दिवसांवर; महसूल विभागाचा नवा आदेश प्रभावी.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील नोंदणी व मुद्रांक शुल्क परताव्याशी संबंधित प्रक्रियेमध्ये मोठा बदल झाला आहे. नागरिकांना आता या परताव्यासाठी महिनोन्महिने वाट बघावी लागणार नाही. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी महत्त्वाचा आदेश काढत, मुद्रांक व नोंदणी शुल्क परताव्याची प्रकरणे प्राप्त झाल्याच्या दिवसातच निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.
याआधी या प्रक्रियेस एक ते दीड महिना किंवा त्याहून अधिक वेळ लागत होता. मात्र जुलै 2025 पासून ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे आणि आता फक्त 15 दिवसांत नागरिकांना परतावा मिळू शकतो. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची त्वरित नोंद करून संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे तपासून त्यावर टिपणी तयार करून मंजुरीसाठी पुढे पाठवावी लागणार आहे.
एप्रिल 2023 अखेर मुद्रांक शुल्काच्या 3924 आणि नोंदणी शुल्काच्या 1716 प्रकरणे प्रलंबित होती. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी याआधी सुमारे 9 ते 12 महिन्यांचा कालावधी लागत असे. पण एप्रिल ते डिसेंबर 2023 या काळात प्राप्त झालेल्या 2535 नव्या प्रकरणांसह एकूण 8175 प्रलंबित प्रकरणांचा निकाली निपटारा जानेवारी 2024 अखेर करण्यात आला.
सद्यस्थितीत जानेवारी ते जून 2025 या कालावधीत तीन हजारांहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात यश आले असून, यासाठी सुमारे एक ते दीड महिना लागला. मात्र जुलैपासून ही प्रक्रिया अधिक गतिमान होत नागरिकांना केवळ 15 दिवसांत परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि शासकीय प्रक्रियेतील पारदर्शकता व कार्यक्षमता वाढणार आहे.