Ganesh Utsav 2025: शाडूच्या गणेश मूर्तींना विक्रमी मागणी, किंमतीत 30% वाढ
शाडूच्या गणेश मूर्तींना विक्रमी मागणी, किंमतीत 30% वाढ
गणेशोत्सव 2025 साठी पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी; किंमतीत 25-30% वाढ. पीओपी मूर्तींवर मर्यादा आणि जागरूकतेमुळे लोक शाडूकडे वळत आहेत.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सव 2025 अवघ्या काही दिवसांवर आला असून, यंदा पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींना विक्रमी मागणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत किंमतीत 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली असूनही, लोकांचा कल शाश्वततेकडे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाकडे स्पष्ट दिसत आहे. पर्यावरणीय जाणीव, सरकारी नियम आणि जनजागृती मोहिमांच्या प्रभावामुळे पीओपीच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्तींना प्राधान्य मिळत आहे.
पुण्यातील कसबा पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ यांसारख्या मूर्तीनिर्मितीच्या पारंपरिक केंद्रांत मूर्ती विक्रीचा जोर वाढला आहे. याआधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती स्वस्त आणि हलक्या असल्यामुळे लोकप्रिय होत्या, पण पाण्यात महिनोनमहिने न विरघळणाऱ्या या मूर्तींमुळे नद्या-तलाव प्रदूषित होतात, जलचरांचा जीव धोक्यात येतो आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेलाही हानी पोहोचते. या पार्श्वभूमीवर, अनेकांनी पीओपीला स्पष्ट नकार देत शाडू, नैसर्गिक माती, कागद किंवा इतर सेंद्रिय साहित्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
मूर्तिकार अभिजीत धोंडफळे म्हणतात, “पीओपी मूर्ती म्हणजे भक्तीच्या नावाखाली निसर्गाला दिलेली हानी आहे. गणपती विघ्नहर्ता आहे, मग आपणच निसर्गात अडथळा का निर्माण करावा? शाडू किंवा नैसर्गिक मातीची मूर्ती ही पूजेप्रमाणेच पर्यावरणासाठी योग्य आहे. पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ पाणी आणि निरोगी निसर्ग सोडायचा असेल तर हा मार्गच योग्य आहे.”
मूर्तिकार गणेश लांजेकर यांच्या मते, लहान शाडू मूर्तींसाठी मागणी वाढली आहे कारण घरी विसर्जनाला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, मोठ्या पीओपी मूर्तींचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. प्रशासनाने मोठ्या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा आणि योग्य मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, असे ते सांगतात.
मूर्तिकार शैलजा मेध सांगतात की, शाडू माती, शेण, पेपर-माची किंवा वनस्पतींच्या बियाण्यांपासून बनवलेल्या मूर्ती काही तासांत पाण्यात विरघळतात आणि कोणतेही हानिकारक अवशेष मागे ठेवत नाहीत. बियाणे उगवून रोप होणे हा निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देतो. तसेच, नैसर्गिक रंगांचा वापर केल्याने नदी-तलावातील पाण्याची गुणवत्ता टिकून राहते.
शाडू मूर्तींच्या मागणीतील वाढ ही केवळ किंमतीच्या वाढीमुळे नाही, तर लोकांच्या बदललेल्या दृष्टिकोनामुळेही आहे. पर्यावरणपूरक पर्याय निवडणे ही आता एक फॅशन नव्हे, तर गरज बनली आहे. यामुळे गणेशोत्सव साजरा करताना भक्ती आणि निसर्गसंवर्धन या दोन्हींचा समन्वय साधला जात आहे.