जळगावच्या पिळोदा खुर्द गावात रस्त्याअभावी चिखल तुडवत अंत्ययात्रा स्मशानापर्यंत
जळगावच्या पिळोदा खुर्द गावात रस्त्याअभावी चिखल तुडवत अंत्ययात्रा स्मशानापर्यंत
जळगाव जिल्ह्यातील पिळोदा खुर्द गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना चिखल तुडवत अंत्ययात्रा नेण्याची वेळ येते. अनेक वर्षांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.
सायली मेमाणे
पुणे १४ ऑगस्ट २०२५ : जळगाव – यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द गावातील ग्रामस्थांना एक गंभीर आणि वेदनादायी समस्या भेडसावत आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता नसल्याने, पावसाळ्यात चिखल तुडवत अंत्ययात्रा नेण्याची वेळ वारंवार येते. मृत व्यक्तीच्या अंतिम प्रवासात ग्रामस्थांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
गावातील स्मशानभूमी मुख्य वस्तीपासून काही अंतरावर आहे. मात्र, तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचते. परिणामी, अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांना अक्षरशः पायघोळ चिखलातून चालत जावे लागते. अनेकदा मृतदेह नेण्यासाठी लोकांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते आणि प्रवास अधिक वेळखाऊ होतो
ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता बांधण्याची मागणी करत आहेत. वारंवार लेखी निवेदनं, ग्रामसभेत ठराव, तसेच लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “आम्ही किती वेळा मागणी करायची? मृताच्या अंतिम प्रवासात अशी यातना सहन करावी लागणे योग्य नाही,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रशासन आणि संबंधित विभागाने या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासने देऊन मतं घेतली जातात, पण नंतर या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते, त्यामुळे तातडीने पक्का रस्ता करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.
अंत्यविधी हा अत्यंत भावनिक क्षण असतो. अशा वेळी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गात अडचणी येणे हे केवळ शारीरिक कष्ट नव्हे तर मानसिक त्रासदायकही आहे. काही ग्रामस्थांनी याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर लवकरच रस्त्याची सोय करण्यात आली नाही, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्याचाही विचार सुरू आहे. पिळोदा खुर्दसारख्या गावांतील मूलभूत सुविधांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.