धाराशिव तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेश स्थापना : आगळावेगळा उत्सवाचा सोहळा
धाराशिव तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेश स्थापना : आगळावेगळा उत्सवाचा सोहळा
धाराशिवच्या तुळजापुरातील ऐतिहासिक साळुंखे गल्लीत पुरातन दगडी विहिरीत गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. जय भारत गणेश मंडळाकडून गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा भक्तांना आकर्षित करते.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : राज्यभरात गणरायाच्या स्वागताचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशे, मिरवणुका, फुलांच्या सजावटी आणि विविध थीमच्या देखाव्यांमुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला अनोखा रंग चढतो. पण याच दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे गणेशाची स्थापना करण्याची एक अद्वितीय परंपरा लोकांचे लक्ष वेधून घेते.
पुरातन विहिरीतील गणेश प्राणप्रतिष्ठा
तुळजापुरातील साळुंखे गल्ली येथील ऐतिहासिक दगडी विहिरीत जय भारत गणेश मंडळाकडून दरवर्षी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गेल्या 15 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून भक्तगण या स्थापनेला विशेष मान देतात. विहिरीच्या दगडी कमानीत विराजमान झालेला बाप्पा भक्तांना प्राचीन वारसा आणि परंपरेची आठवण करून देतो.
गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, या उपक्रमामागे फक्त धार्मिक भावना नसून ऐतिहासिक विहिरीच्या संवर्धनाचाही हेतू आहे. आधुनिक काळात विहिरींचं अस्तित्व धोक्यात आलं असलं तरी तुळजापूरातील या मंडळाने धार्मिकतेला जपतानाच वारसा टिकवण्याचं कार्य केलं आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक संदेशही देतो.
दरवर्षी हजारो भाविक या आगळ्या वेगळ्या गणेश स्थापनेचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. विहिरीतील नैसर्गिक थंडावा, दगडी कमानीतील सजावट आणि भक्तिरसात रंगलेलं वातावरण यामुळे या गणेशोत्सवाला आगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेषतः गणेश मिरवणुकीनंतर येथे होणारी प्राणप्रतिष्ठा भाविकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरते.
स्थानिक नागरिक सांगतात की, ही परंपरा टिकून राहावी म्हणून सर्वांनी मिळून सहकार्य केले आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून एकत्र येण्याचा, संस्कृती जपण्याचा आणि वारसा पुढे नेण्याचा मार्ग आहे, असे मत भक्तांनी व्यक्त केले.
मुंबईतील लालबागचा राजा, पुण्यातील मानाचे पाच गणपती, कोकणातील गावागावातल्या पारंपरिक प्रतिष्ठापना या सगळ्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्यं आहेत. त्यातच तुळजापुरातील ही “विहिरीतील गणेश स्थापना” एक आगळं वैशिष्ट्य म्हणून ओळखली जाते.