Air India Crash Ahmedabad : एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर
एअर इंडियाच्या अहमदाबाद दुर्घटनेबाबत AAIB ने प्राथमिक अहवालात टेकऑफनंतर दोन्ही इंजिन अचानक बंद झाल्याचे उघड केले आहे. तांत्रिक बिघाडाची शक्यता असून अंतिम अहवालात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
अहमदाबाद, १२ जुलै २०२५ : एअर इंडियाच्या १२ जून २०२६ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) जाहीर केला आहे. या अहवालात टेकऑफनंतर केवळ काही सेकंदात दोन्ही इंजिन अचानक बंद झाल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ही दुर्घटना गंभीर तांत्रिक बिघाडामुळे घडली असण्याची शक्यता आता पुढे आली आहे.
AAIB च्या १५ पानी प्राथमिक अहवालानुसार, विमानाने सकाळी ८:०८ वाजता टेकऑफदरम्यान १८० नॉट्स (सुमारे ३३४ किमी/तास) इतकी गती गाठली होती, तेव्हा अचानक दोन्ही इंजिनांचे ‘कटऑफ’ स्विच ‘RUN’ स्थितीतून ‘CUTOFF’ स्थितीत गेले. यामुळे दोन्ही इंजिनांना इंधनपुरवठा थांबला आणि इंजिनांच्या गतीत झपाट्याने घट होऊन त्यांचा अपयश ओढवला.
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये, एक वैमानिक दुसऱ्याला विचारतो की, “इंजिन बंद का केलं?” त्यावर दुसरा उत्तर देतो, “मी काहीच केलं नाही.” ही संवादाची देवाणघेवाण अतिशय चिंताजनक मानली जात असून, दोन्ही वैमानिकांनी कोणतीही कृती केल्याचे नाकारल्यामुळे तांत्रिक यंत्रणेतील अपयशाची शक्यता अधिक दृढ झाली आहे. मात्र, अद्याप या बिघाडामागचे निश्चित कारण शोधले गेलेले नाही.
इंजिन बंद झाल्यानंतर वैमानिकांनी हवेतच इंजिन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले. त्यात इंजिन १ काही प्रमाणात प्रतिसाद देताना दिसले, मात्र इंजिन २ पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊ शकले नाही. नंतर ऑटोस्टार्ट मोडमध्ये स्विच केले गेले, पण विमान अस्थिर राहिले.
तपास संस्थेने विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले असून त्यात टेकऑफनंतर लगेचच ‘Ram Air Turbine’ (RAT) — आपत्कालीन उर्जा निर्मितीसाठी वापरली जाणारी यंत्रणा — कार्यरत झालेली दिसते. यावरून मुख्य उर्जा प्रणालीत मोठा बिघाड झाल्याचे स्पष्ट होते, जो दोन्ही इंजिन बंद झाल्यामुळे झाला असण्याची शक्यता आहे.
AAIB ने म्हटले आहे की, ही प्राथमिक माहिती असून तपास अद्याप सुरू आहे. अंतिम अहवालात यामागे दुर्मिळ तांत्रिक बिघाड होता की यंत्रणासंबंधी काही चूक होती, हे स्पष्ट होईल. सध्या कोणत्याही संभाव्य घातपात किंवा मानवी चुकांची शक्यता स्पष्टपणे नाकारलेली नाही.