ऐश्वर्या रायला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; फोटो आणि कंटेंटच्या गैरवापरावर बंदी
ऐश्वर्या रायला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; फोटो आणि कंटेंटच्या गैरवापरावर बंदी
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला. परवानगीशिवाय फोटो, आवाज आणि कंटेंट वापरणं तिच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयाने म्हटलं. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि गुगलला नोटीस.
सायली मेमाणे
पुणे १२ सप्टेंबर २०२५ : बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. परवानगीशिवाय तिचे फोटो, आवाज आणि कोणतेही डिजिटल कंटेंट वापरणं म्हणजे सन्मानाने जगण्याच्या तिच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या आदेशामुळे केवळ ऐश्वर्यालाच नव्हे तर इतर अनेक सेलिब्रिटींनाही डिजिटल युगात आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी कायदेशीर आधार मिळणार आहे.
ऐश्वर्या रायने दाखल केलेल्या तक्रारीत तिच्या नावाने आणि प्रतिमेचा गैरवापर होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. विशेषत: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, गुगलवरील काही लिंक्स तसेच ऑनलाईन जाहिरातींमध्ये तिच्या परवानगीशिवाय फोटो आणि आवाज वापरला जात असल्याचे सांगण्यात आले होते. या बाबींचा विचार करत दिल्ली उच्च न्यायालयाने संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे की ऐश्वर्याने तक्रारीत नमूद केलेल्या URL 72 तासांच्या आत काढून टाकले पाहिजेत. त्याचबरोबर त्या लिंक्स डिऍक्टिव्हेट किंवा ब्लॉक करण्याचे अंतरिम निर्देशही दिले आहेत. यामुळे ऐश्वर्याच्या डिजिटल ओळखीचा गैरवापर थांबवण्यासाठी न्यायालयीन स्तरावर ठोस पाऊल उचलले गेले आहे.
या निर्णयामुळे पुन्हा एकदा ‘Right to Publicity’ आणि ‘Right to Privacy’ या अधिकारांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. भारतात डिजिटल कंटेंटचा वापर प्रचंड वाढला आहे आणि त्याचबरोबर सेलिब्रिटींच्या प्रतिमा, आवाज किंवा व्हिडिओज परवानगीशिवाय वापरल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे सेलिब्रिटींच्या सन्मानावर परिणाम होतोच, शिवाय त्यांच्या चाहत्यांना दिशाभूल करण्याची शक्यताही निर्माण होते.
ऐश्वर्या राय ही जागतिक पातळीवर लोकप्रिय अभिनेत्री असून, तिच्या प्रतिमेचा गैरवापर जाहिरात किंवा उत्पादन विक्रीसाठी करणे हे सरळसरळ कायदेशीर उल्लंघन आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निर्णय भविष्यात अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आदर्श ठरू शकतो.
ई-कॉमर्स कंपन्या, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि गुगलसारख्या डिजिटल दिग्गजांवर जबाबदारी टाकत न्यायालयाने म्हटले आहे की अशा उल्लंघनांना तातडीने आळा बसला पाहिजे. अन्यथा सेलिब्रिटींच्या प्रतिमेचा अनधिकृत वापर वाढत राहील आणि त्यातून अनेक कायदेशीर वाद निर्माण होतील.
या प्रकरणानंतर मनोरंजन क्षेत्रात आणि कायदेशीर क्षेत्रात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सेलिब्रिटींनी डिजिटल हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. चाहत्यांसाठीही हा निर्णय महत्वाचा ठरतो कारण यामुळे त्यांना अधिकृत आणि प्रामाणिक कंटेंट मिळेल याची खात्री राहील.
दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ ऐश्वर्या रायसाठी दिलासा देणारा नसून, भविष्यातील डिजिटल अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे हा आदेश मनोरंजन जगतातील सर्व कलाकारांसाठी मोठा संदेश ठरत आहे.