कल्याणमधील गांधी शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना टिकली-टिळ्यावर बंदी, शिवसेना ठाकरे गट आक्रमक
कल्याणमधील गांधी शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना टिकली-टिळ्यावर बंदी, शिवसेना ठाकरे गट आक्रमक
कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी शाळेने हिंदू विद्यार्थ्यांना टिळा, टिकली, धागा व बांगडीवर बंदी घातली. पालकांनी नाराजी व्यक्त करत तक्रार दाखल केली असून, शिवसेना ठाकरे गटाने शाळा प्रशासनाला धारेवर धरले.
सायली मेमाणे
पुणे १ ऑक्टोबर २०२५ : कल्याण शहरात एका शाळेच्या निर्णयामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी या शाळेने धार्मिक सहिष्णुतेच्या नावाखाली हिंदू विद्यार्थ्यांना टिळा, टिकली, धागा आणि बांगडी घालण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून शाळेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या नियमांविरोधात पालकांनी थेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली आहे.
शाळेच्या या आदेशानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी थेट शाळेत धडक मारत व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना जाब विचारला. या प्रकरणामुळे शाळेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला. शाळेने विद्यार्थ्यांना टिळा किंवा टिकली लावण्यास मज्जाव केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
शाळेच्या नियमांबद्दल विचारणा केल्यावर सुरुवातीला व्यवस्थापनाने कोणतेही असे नियम नसल्याचे सांगून प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पालक आणि माध्यमांकडून वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनी असे नियम काढले असल्याचे मान्य केले. शाळेचे सिक्रेटरी मनोहर पालन, डायरेक्टर स्वप्नाली रानडे आणि मुख्याध्यापक संजय पाटील यांनी या प्रकरणावर भूमिका मांडताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असे नियम करण्यात आले होते. धागा किंवा बांगडीमुळे इजा होऊ शकते तसेच टिळा किंवा टिकलीमुळे शाळेत धार्मिक वाद होऊ शकतो, त्यामुळे केवळ मार्गदर्शन म्हणून हे नियम केले गेले होते.
परंतु पालक आणि स्थानिक राजकीय पक्षांनी याला तीव्र विरोध केला. त्यांचे म्हणणे आहे की इतर धर्मांबाबत अशा प्रकारचे नियम शाळा घालत नाही, मग फक्त हिंदू विद्यार्थ्यांवरच हे निर्बंध का? असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. “आम्ही इतर धर्माला कधीही सांगत नाही की त्यांनी टिळा, टिकली किंवा धार्मिक चिन्हांचा वापर करू नये. मग आमच्या धर्मावर बंधन का?” असा सवाल ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
यामुळे शाळेत झालेल्या बैठकीत ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना धारेवर धरत शाळेने धार्मिक आस्था दुखावल्याचा आरोप केला. शाळेने दिलेल्या स्पष्टीकरणावरही पालक आणि राजकीय पक्ष समाधानी झालेले नाहीत. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाकडे आता केवळ पालक आणि विद्यार्थीच नाही तर संपूर्ण कल्याण शहराचे लक्ष लागले आहे. शाळेने ज्या उद्देशाने हे नियम केले असल्याचे सांगितले तो खरा असला तरी त्यातून हिंदू विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेच्या निर्णयामुळे निर्माण झालेला हा वाद अजून शमलेला नाही.