गणेश नाईकांचा दावा : युती होवो अथवा न होवो, नवी मुंबईचा महापौर मीच
गणेश नाईकांचा दावा : युती होवो अथवा न होवो, नवी मुंबईचा महापौर मीच
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार. नवी मुंबईकरांनी आम्हाला सतत साथ दिली आहे आणि भविष्यातही देतील.”
सायली मेमाणे
पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : वनमंत्री गणेश नाईक यांनी युती किंवा विरोधकांची परिस्थिती काहीही असली तरी नवी मुंबई महापालिकेचा महापौर तेच ठरवणार असल्याचा ठाम दावा केला आहे. 101 सेवाभावी सामाजिक उपक्रमांच्या पंधरवड्याच्या समारोपासह त्यांच्या सुवर्णवर्षे अविरत कार्याचे गौरव समारोह वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी स्थायी सभापती संपत शेवाळे, प्रभाकर भोईर, शशिकांत राऊत, अंजली वाळुंज, दयावती शेवाळे, लता मढवी, फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत आदी आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
गणेश नाईक म्हणाले की, आगामी काळात वा निवडणुकांमध्ये मतदारांनी सावध राहावे व कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. नवी मुंबईकरांच्या भविष्यातील जलसमृद्धीसाठी कर्जत तालुक्यातील पोशिर धरणातून 500 एमएलडी पाणी घेण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी पालिकेला अंदाजे 4 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत. तसेच 14 गावांचा समावेश नवी मुंबईत झाला असला तरी त्याबाबत पालिकेला विचारले गेले नाही. नाईक म्हणाले की, “मी इतके वर्ष या जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. मला पचत नाही असे म्हणतात, पण मला पटत नाही म्हणून बोलतोय.”
गणेश नाईक यांनी म्हटले की, निवडणुका आल्यास नागरिकांना पार्ट्या, पैसे व यात्रा देण्याचा प्रयत्न होईल, पण आजपर्यंत नवी मुंबईकरांनी साथ दिली आहे आणि भविष्यातही देतील. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर ते युतीसाठी तयार असतील, परंतु सन्मान न झाल्यास युतीला विरोध करतील.
तसेच त्यांनी उदय सामंत यांच्या “नवी मुंबई एकनाथ शिंदेंची आहे” या विधानाचा उल्लेख करत “नवी मुंबई कोणाची आहे हे जनतेला माहीत आहे. उद्या ते म्हणतील अमेरिका आमची आहे तर चालणार का?” असे विचारले. 3 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासंबंधी बैठक होणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी गणेश नाईक यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीचा आढावा सादर केला. मोरबे धरणाची खरेदी आणि उपयुक्तता समजावत “श्रीगणेश सरोवर” असे धरणाचे नाव ठेवण्याचा प्रस्ताव आणि परिसराला तिर्थक्षेत्र म्हणून साजेशी ओळख देण्याची भावना व्यक्त केली.