IMD Red Alert: पुढचे 72 तास मुंबई, पुणे आणि कोकणसाठी धोक्याचे
IMD Red Alert: पुढचे 72 तास मुंबई, पुणे आणि कोकणसाठी धोक्याचे
IMD ने पुढच्या 72 तासांसाठी मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी; शेतकऱ्यांसाठी खास सल्ला.
सायली मेमाणे
पुणे २७ सप्टेंबर २०२५ : मुंबई-पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढच्या 72 तासांसाठी महाराष्ट्रातील काही भागांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने विशेषतः मुंबई, पुणे, रायगड आणि रत्नागिरीसह घाटमाथ्यावरील भागांसाठी रेड व ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
IMD च्या अंदाजानुसार, 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि पुणे घाटमाथा यासाठी 28 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी ठाणे, मुंबई व रत्नागिरीमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट, 30–40 किमी प्रती तास वेगाचा जोरदार वारा आणि मुसळधार पावसाची तीव्रता अनुभवायला मिळेल.
मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 26 सप्टेंबर रोजी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 27 सप्टेंबरला अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
IMD ने नागरिकांसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. घराबाहेर न पडण्यापूर्वी रस्त्यावरील वाहतूक स्थिती तपासावी, जुन्या आणि कमजोर बांधकामात राहणे टाळावे, विजेच्या कडकडाटाच्या वेळी उंच झाडे किंवा विद्युत वाहक वस्तूंखाली आसरा घेऊ नका, तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करावी.
शेतकऱ्यांसाठी देखील हवामान विभागाने खास सल्ला दिला आहे. पिकलेली पिके लवकरात लवकर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवा. कापणी केलेला माल व्यवस्थित झाकून ठेवा आणि शेतात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित काढून टाकण्याची व्यवस्था करावी. गुरे व इतर शेतातील जनावरांना वादळ व विजांच्या वेळी गोठ्यात किंवा घरामध्ये सुरक्षित ठेवा.
हवामान विभागानुसार, सप्टेंबर महिना संपत आला तरी मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना आणि हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्यांवर सतत लक्ष ठेवावे. पुढील काही दिवस राज्यात पावसाची तीव्रता जास्त राहणार असल्याने सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.
सार्वजनिक वाहतूक, प्रवास नियोजन आणि घरातील सुरक्षिततेसाठी नागरिकांनी योग्य तयारी करणे आवश्यक आहे. हवामान विभागाच्या सतर्कतेमुळे मोठ्या दुर्घटना आणि नुकसान टाळता येईल. या काळात प्रशासन, पोलिस व अग्निशमन यंत्रणा सतत सज्ज आहेत आणि नागरिकांशी संपर्कात राहतील.