Lalbaugcha Raja News: लालबागच्या राजाच्या VIP दर्शन वादावर मानवाधिकार आयोगाची नोटीस
Lalbaugcha Raja News: लालबागच्या राजाच्या VIP दर्शन वादावर मानवाधिकार आयोगाची नोटीस
लालबागच्या राजाच्या VIP दर्शन व्यवस्थेविरोधात मानवाधिकार आयोगाने मंडळाला नोटीस बजावली आहे. सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
सायली मेमाणे
पुणे ३ सप्टेंबर २०२५ : मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेले लालबागचा राजा मंडळ सध्या वादात सापडले आहे. यंदा गणेशोत्सव काळात व्हीआयपी व्यक्तींसाठी स्वतंत्र दर्शन रांगा तयार करण्यात आल्या होत्या. सामान्य नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत असताना, काही मिनिटांत व्हीआयपी लोकांना दर्शनाची संधी मिळत असल्याची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली. या तक्रारीवर आयोगाने मंडळाला नोटीस बजावली असून, आता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे.
लालबागचा राजा हा दरवर्षी लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरतो. मुंबईसह राज्यभरातून भाविक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येथे गर्दी करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून व्हीआयपी दर्शन व्यवस्थेमुळे सामान्य भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यंदा आशिष रॉय आणि पंकज मिश्रा या दोन भाविकांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही व्यवस्था मानवाधिकारांचे उल्लंघन असून, समानतेच्या तत्त्वाविरुद्ध आहे.
आयोगाचे अध्यक्ष अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. यामध्ये आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनाही नोटीस बजावली आहे. सर्व प्रतिवादींना सहा आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लालबागचा राजा मंडळाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, मानवाधिकार आयोगाने थेट दखल घेतल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोगाचा निर्णय हा सामान्य भाविकांच्या हक्कांचे रक्षण करणारा असल्याचे मानले जात आहे.
दरवर्षी लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात. अनेक भाविक रात्रीपासूनच रांगेत उभे राहतात आणि काही वेळा १२-१४ तास प्रतीक्षा करून बाप्पाचे दर्शन घेतात. अशा परिस्थितीत व्हीआयपी संस्कृतीमुळे होणारा भेदभाव ही मोठी समस्या असल्याचे नागरिकांचे मत आहे. यापूर्वीही या विषयावर चर्चा झाली असली तरी यावेळी आयोगाने औपचारिकरीत्या नोटीस बजावल्याने वाद अधिक गंभीर झाला आहे.
लालबागच्या राजाचे महत्त्व लक्षात घेता, भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न इथे जोडला जातो. त्यामुळे भविष्यातील दर्शन व्यवस्था समानतेच्या तत्त्वावर आधारित असावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आयोगाच्या हस्तक्षेपामुळे यंदाचा उत्सव फक्त भक्तीचा नव्हे तर सामाजिक न्यायाचा मुद्दा ठरत आहे.