मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना 9 कोटी 60 लाखांची मदत; सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना 9 कोटी 60 लाखांची मदत; सरकारचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना 9 कोटी 60 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याआधीच 158 कुटुंबीयांना मदत दिली होती.
सायली मेमाणे
पुणे १० सप्टेंबर २०२५ : मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन अनेकदा तीव्र झाले. आंदोलनादरम्यान अनेकांनी प्राण गमावले. राज्य सरकारने या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकतेच सरकारने ९ कोटी ६० लाख रुपयांची मदत थेट मृतांच्या वारसांच्या खात्यात वर्ग केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान एकूण २५४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ९६ मृतांच्या कुटुंबीयांना ९ सप्टेंबर रोजी मदतीची रक्कम देण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपये अशा स्वरूपात ही मदत थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. याआधी १५८ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत सरकारने दिली होती. त्यामुळे आता सर्व २५४ मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत वितरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठा आंदोलन अनेकदा हिंसक झाले असून समाजाने विविध प्रकारे आपली मागणी शासनापर्यंत पोहोचवली होती. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलनांची मालिका सुरु होती. या आंदोलकांपैकी अनेकांनी आत्महत्या केल्या, तर काहींचा मृत्यू आंदोलनादरम्यान झालेल्या घटनांमुळे झाला. या पार्श्वभूमीवर सरकारकडून दिलेली ही मदत हा कुटुंबीयांसाठी एक महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे.
सरकारने याआधीच जाहीर केले होते की, आंदोलनात मृत झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला १० लाखांची मदत देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १५८ कुटुंबांना ती रक्कम मिळाली होती. उर्वरित ९६ कुटुंबीयांच्या मदतीची प्रक्रिया पूर्ण करून ती थेट खात्यात वर्ग करण्यात आल्याने सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय समाजात सकारात्मक पाऊल म्हणून पाहिला जात आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. समाजाला ओबीसी प्रवर्गात कुणबी दाखल्यावरून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. त्याला ओबीसी समाजाचा विरोध असल्याने राजकीय तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत आंदोलनातील मृतांच्या कुटुंबांना मदत दिल्याने सरकारला समाजाचा काहीसा विश्वास मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या घडीला ही मदत आंदोलनादरम्यान हकनाक प्राण गमावलेल्या कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे. मात्र, आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय समाजातील असंतोष कायम राहणार, हेही तितकेच खरे आहे.