मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ट्रॅफिक जॅममध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; 5 तास अडकली अँब्युलन्स

0
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ट्रॅफिक जॅममध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; 5 तास अडकली अँब्युलन्स

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ट्रॅफिक जॅममध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; 5 तास अडकली अँब्युलन्स

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भीषण वाहतूक कोंडीमुळे 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा अँब्युलन्समध्ये मृत्यू झाला. पाच तास उपचारासाठी वेळेत पोहोचता न आल्याने निष्पाप जीव गेला, स्थानिकांमध्ये संतापाची लाट.

सायली मेमाणे

पुणे १९ सप्टेंबर २०२५ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे एका 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी गेला असून ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ठरली आहे. ठाणे-घोडबंदर महामार्गावरील दुरुस्तीच्या कामांमुळे आणि अवजड वाहनांची वाहतूक थांबवल्यामुळे सकाळपासूनच भीषण ट्रॅफिक जॅम निर्माण झाला. याच कोंडीत एका अँब्युलन्सला तब्बल पाच तास अडकून रहावे लागले आणि वेळेत उपचार न मिळाल्याने निष्पाप बाळाने आईच्या कुशीतच प्राण सोडला. ही घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतापाची लाट उसळली आहे.

चिंचोटी नायगाव येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने मुंबईतील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबियांनी रुग्णवाहिका बोलावून तातडीने प्रवास सुरू केला मात्र महामार्गावरील अनियंत्रित ट्रॅफिकमध्ये ही रुग्णवाहिका अडकली. सुमारे पाच तास रुग्णालयापर्यंत पोहोचता न आल्यामुळे बाळाची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेरीस त्याचा मृत्यू झाला. आईच्या कुशीतच निष्पाप जीव जाण्याचा हा प्रसंग पाहून उपस्थितांचा हृदय पिळवटून निघाला.

याच महामार्गावर काही आठवड्यांपूर्वी आणखी एक जीव वाहतूक कोंडीमुळे गेला होता. सफाळे पश्चिम मधुकर नगर येथील छाया कौशिक पुरव या महिलेच्या अंगावर झाड कोसळले होते. गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना मुंबईत हलवण्यात येत होते, मात्र महामार्गावरील खड्डे आणि ट्रॅफिक जॅममुळे अँब्युलन्स वेळेत रुग्णालयात पोहोचू शकली नाही. मिरा रोड येथील रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्या मरण पावल्या. अल्पावधीत दोन निरपराधांचा जीव या वाहतूक कोंडीमुळे जाणे हे प्रशासनासाठी मोठा धक्का मानले जात आहे.

स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गावरील दुरुस्ती कामे व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध हे नियोजनाशिवाय राबवले जात असल्याचा आरोप होत आहे. ट्रॅफिक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना मार्ग मिळत नसल्यामुळे जीवितहानी होत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, रुग्णवाहिकांना ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.

तज्ज्ञांच्या मते, अशा आपत्कालीन घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासन, महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी कामे नियोजित पद्धतीने केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. पण नियोजनाचा अभाव आणि निष्काळजी वृत्ती यामुळे सामान्य माणसांना प्राणाची किंमत मोजावी लागत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा देशातील सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असून दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, वारंवार होणारी दुरुस्ती कामे, खड्डे आणि अवजड वाहनांची गर्दी यामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. प्रशासनाकडून नेहमीच दावे केले जातात की रुग्णवाहिकांना प्राधान्य दिले जाते, पण प्रत्यक्षात या घटनांनी ते खोटे ठरवले आहे.

या दोन जीवघेण्या घटनांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नागरिकांनी यापुढे अशी जीवघेणी परिस्थिती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अजून कित्येक निरपराधांचे प्राण वाहतूक कोंडीत अडकून जाण्याचा धोका कायम राहील.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed