Mumbai Mega Block: उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, लोकल वेळा बदलणार
उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, लोकल वेळा बदलणार
मुंबईकरांनी काळजी घ्या! २९ जून रोजी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द वा विलंबित. वेळापत्रक पाहूनच प्रवास करा.
सायली मेमाणे
मुंबई २८ जून २०२५ : मुंबईकरांनी आता रविवारच्या प्रवासासाठी विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे, कारण २९ जून २०२५ रोजी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर महत्त्वाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या वेळेत देखभाल-दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी, काही लोकल फेऱ्या पूर्णतः रद्द करण्यात येतील, तर काही फेऱ्या साधारणतः २० मिनिटे विलंबाने धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
याचवेळी हार्बर रेल्वेमार्गावरही पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. तथापि, CSMT ते वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा उपलब्ध असणार आहे. ठाणे-वाशी/नेरूळ आणि खारकोपर मार्गावरील सेवा सुरु राहतील, मात्र ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील अन्य सेवा विलंबाने धावतील.
मेगाब्लॉकचा मुख्य उद्देश रूळ व सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या सुरळीतपणे पार पाडण्याचा आहे. मुंबईतील लोकल सेवा लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असल्याने अशा देखभाल कामे अत्यंत आवश्यक असतात.
दरम्यान, रेल्वेच्या भविष्यातील विस्तारीकरणासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) ने व्यवहार्यता अभ्यासासाठी स्वारस्यपत्र मागवले आहेत. हे अभ्यास अहवाल भविष्यातील नवीन मार्ग, स्टेशन अपग्रेडेशन आणि जलद सेवा प्रकल्पांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. MRVC चे अध्यक्ष विलास सोपान वाडेकर यांनी सांगितले की, “महामुंबईत सुरक्षित, स्मार्ट आणि जलद वाहतूक सेवा निर्माण करणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य आहे. MUTP-4 अंतर्गत जागतिक दर्जाचा रेल्वे प्रवास नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
मुंबईच्या नागरिकांना सुचवण्यात येत आहे की, रविवार २९ जून रोजी रेल्वे प्रवास करताना वेळापत्रक व रेल्वे अपडेट्स तपासूनच घराबाहेर पडावं, जेणेकरून अनावश्यक त्रास आणि विलंब टाळता येईल.