Nagpur Flood Update: विदर्भात पूर, पाचजण वाहून गेले, गोंदियात कारवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू
विदर्भात पूर, पाचजण वाहून गेले, गोंदियात कारवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू
नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात पाचजण पुरात वाहून गेले, तर गोंदियात झाड कोसळून कारमधील दोघांचा मृत्यू. विदर्भात मुसळधार पावसामुळे गंभीर स्थिती.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : विदर्भात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेने नदी-नाल्यांना पूर आला असून, एकूण पाचजण वाहून गेले आहेत. यामध्ये दोन व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित तिघांचा शोध राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून सुरू आहे. दुसरीकडे, गोंदियात झाड कोसळून कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव उगले परिसरात राहणारा १८ वर्षीय कार्तिक लाडसे हा युवक बुधवारी पहाटे गावातील नाला ओलांडताना वाहून गेला. शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला. दुसरी घटना सावनेरमधील बोरगाव बुजुर्ग येथे घडली. अनिल पानपत्ते हे सकाळी नाला पार करताना वाहून गेले आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बोदरठाण येथे प्रफुल्ल शेंद्रे हे नाल्यात वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळच्या झरी-जामणी तालुक्यातील धानोरा गावातील सतीश दुर्गावार हे शेतावर जाताना नाल्यात पडून वाहून गेले आणि त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील देशपूर येथे राजू तुमराम हे शेतावरून घरी परत येत असताना नाल्यातील पुरात वाहून गेले.
गोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर मोठी दुर्घटना घडली. रस्त्याच्या कडेला असलेले झाड मुसळधार पावसामुळे उन्मळून पडले आणि एका कारवर कोसळले. यात वासुदेव खेडकर (६०) आणि आनंद राऊत (५०) यांचा मृत्यू झाला. तर, रितिक दिघोरे (२२), राजू चौरागडे (४६) आणि अनिल चौधरी (४६) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सडक-अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे काही वेळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या संपूर्ण घटनांमुळे विदर्भातील पूरस्थिती किती भयावह आहे हे समोर आले आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन आणि नागरिक दोघांनाही अधिक काळजी घेण्याची गरज आहे.