Nagpur News: मद्यधुंद आर्मी जवानाचा थरकाप, 30 नागपुरकरांचे प्राण धोक्यात
मद्यधुंद आर्मी जवानाचा थरकाप – ३० लोकांचे प्राण धोक्यात, जमावाने भर रस्त्यात चोपले
Nagpur Crime: रामटेकमधील नगरधन येथे मद्यधुंद आर्मी जवानाने भरधाव कारने ३० नागरिकांचे प्राण धोक्यात आणले. गावकऱ्यांनी भररस्त्यात चोप दिला, पोलीस तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन परिसरात एक संतापजनक घटना घडली असून, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवत कमीत कमी ३० जणांचे प्राण धोक्यात आणले.
हर्षपाल महादेव वाघमारे असे या जवानाचे नाव असून तो सध्या आसाम येथे भारतीय लष्करात कार्यरत आहे. चार दिवसांपूर्वी तो सुट्टीवर घरी आला होता आणि दारूच्या व्यसनामुळे त्याने जबाबदारीशून्य वर्तन केल्याचे समोर आले आहे. सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगरधन येथील दुर्गा चौक, साई मंदिर मार्गे हमलापुरीकडे जात असताना त्याच्या कारवरील ताबा सुटला आणि ती थेट नाल्यात जाऊन पलटी झाली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात प्रचंड घबराट पसरली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, जवानाने कार पादचाऱ्यांच्या जवळून अत्यंत वेगात नेत, त्यांना कट मारत धडक दिल्याचा आरोप आहे. अनेकांना तो धडकवून पुढे गेला असून, एका चुकीच्या कृतीने संपूर्ण गाव हादरले.
संतप्त नागरिकांनी त्याला कारमधून बाहेर ओढून तोंडातून रक्त येईपर्यंत जबर मारहाण केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रामटेक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली असून, देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानाकडून असे बेधडक वर्तन अपेक्षित नसल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.