Navi Mumbai News: महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला ५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला ५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
पेण येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला तांत्रिक परवान्यासाठी ५ हजारांची लाच घेताना नवी मुंबई ACB ने पकडले.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : नवी मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) मधील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. पेण सर्कल कार्यालयात कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता संजय जाधव यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. तांत्रिक परवान्यासाठी लाच मागितल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही कारवाई झाल्यानंतर महावितरणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
संजय जाधव हे पेण सर्कल कार्यालयात उपकार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. खालापूर तालुक्यातील एका जमीन मालकाच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या जमिनीवरून उच्चदाब विद्युत वाहिन्या जात होत्या. या वाहिन्यांचे स्थलांतर करण्याचे काम मे. शाक्य एंटरप्रायजेस या कंपनीला देण्यात आले होते. हे काम सुरु करण्यासाठी कंपनीला महावितरणकडून तांत्रिक परवाना आवश्यक होता.
तक्रारदार कंपनीने नियमानुसार अर्ज केल्यानंतरही अभियंता संजय जाधव यांनी परवाना देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाच मागण्याच्या या प्रकरणामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने त्वरित नवी मुंबई एसीबीकडे संपर्क साधला. तक्रारीच्या आधारे ACB ने सापळा रचून संजय जाधव यांना ५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
ACB अधिकाऱ्यांनी सांगितले की, “परवान्यासाठी जाधव यांनी ठरवून ठेवलेल्या रकमेनुसार लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.” या घटनेची नोंद घेऊन अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक उपक्रमात भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटनांमुळे लोकांच्या मनात नाराजीचा सूर उमटत आहे. नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून असे वर्तन अपेक्षित नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
एसीबीने या प्रकरणानंतर पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास त्याबाबत तात्काळ तक्रार करावी. लाच देणे आणि घेणे हे दोन्ही गंभीर गुन्हे असून, याबाबतची माहिती दिल्यास गोपनीयतेचे पालन करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एसीबी विभागाने दिली आहे.
सार्वजनिक सेवांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.