Palghar Crime: लिव्ह-इन रिलेशनशिपमधील वादातून प्रियकराचा खून, आरोपी फरार
पुण्यात २४ तासांत दोन गोळीबार प्रकरणे; पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला
पालघरच्या बोईसर परिसरात धक्कादायक खून प्रकरण! लिव्ह-इन रिलेशनशिपमधील वादातून सुरेंद्र सिंहने हरीश सुखाडी याची हत्या केली. आरोपी महिला व मुलासह फरार, पोलीस तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे ५ सप्टेंबर २०२५ : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील पास्थल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या महिला जोडीदाराच्या प्रियकराला घरात बोलावून निर्दयीपणे हत्या केली. ही घटना इतकी भयानक होती की पीडिताचा कोथळाच बाहेर आला होता. या हत्याकांडानंतर आरोपी सुरेंद्रसिंह, त्याची महिला जोडीदार रेखा सिंह आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा फरार झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पास्थलमधील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये सुरेंद्रसिंह रेखा सिंहसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. रेखाने पहिला पती सोडून सुरेंद्रसोबत नातं जुळवलं होतं आणि तिचा मुलगाही त्यांच्यासोबत राहत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी रेखाची ओळख हरीश सुखाडी नावाच्या तरुणाशी झाली. या ओळखीचं नातं अधिक जवळीकचं झाल्यानं सुरेंद्र संतापला.
या नात्याचा बदला घेण्यासाठी सुरेंद्रने एक भयंकर कट आखला. त्याने रेखाच्या मदतीने हरीशला काही बहाण्याने घरी बोलावले. हरीश घरात आल्यानंतर सुरेंद्रने प्रथम त्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला चढवून धारदार शस्त्राने भोसकले. या हल्ल्यात हरीश गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. हल्ला इतका भीषण होता की हरीशच्या पोटातून कोथळा बाहेर आला होता आणि त्याच्या पोटात चाकूचा तुकडाही अडकलेला आढळला.
घटनेनंतर सुरेंद्र, रेखा आणि त्यांचा आठ वर्षीय मुलगा घराला कुलूप लावून फरार झाले. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. बोईसर तारापूर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधील वाद एवढा टोकाला जाईल याचा कोणी विचारही केला नव्हता. हरीश सुखाडीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे आणि आसपासच्या परिसरात सापळा रचला आहे.
पालघर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा लिव्ह-इन रिलेशनशिप, नातेसंबंधातील अविश्वास आणि हिंसाचार यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नातेसंबंधातील वादातून थेट हत्या करण्यापर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणामुळे समाज हादरून गेला आहे. पोलिस लवकरच आरोपींना अटक करतील आणि पीडितेला न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.