अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा आरोप
अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा आरोप
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप. शेतकरी आंदोलनाची चेतावणी.
सायली मेमाणे
पुणे ९ सप्टेंबर २०२५ : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत एक धक्कादायक घोटाळ्याचा आरोप समोर आला आहे. तब्बल २०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघड करत आमदार रोहित पवार यांनी थेट पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, संचालक मंडळातील सदस्य आणि अधिकारी यांनी संगनमताने मोठा भ्रष्टाचार केला असून मंत्रालयापर्यंत हफ्ते दिले जात असल्याचा संशय आहे. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत संस्था असून येथेच शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुणे बाजार समितीत होणारी ही शेतकऱ्यांची लूट तातडीने थांबवली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कष्टाने आलेला पैसा काही मंडळी गैरकारभार करून लाटत आहेत, हा प्रकार असह्य आहे. त्यांनी आरोप केला की, यामध्ये संबंधित संचालक मंडळातील काहीजण, अधिकारी तसेच इतर व्यक्तीही सामील आहेत. एवढेच नव्हे तर मंत्रालयातही या पैशाचे हफ्ते पोहोचवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
या प्रकरणावर शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी इशारा दिला की, जर पुढील पंधरा दिवसांत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही आणि शेतकऱ्यांच्या पैशाची लूट थांबवली नाही तर शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरेल. हे आंदोलन अराजकीय असेल आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या आरोपांमुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे राज्य शासन शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पैशाची अशा प्रकारे लूट होत असल्याचे आरोप राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. अजित पवार हे राज्याचे महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्यामुळे हा वाद आणखीनच गाजत आहे.
शेतकरी संघटनांकडूनही या आरोपांची दखल घेऊन शासनावर दबाव आणण्याची तयारी सुरू आहे. कारण बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी महत्त्वाच्या संस्था आहेत. जर याठिकाणीच गैरव्यवहार होत असेल तर शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत कोणीच देत नाही, असा रोष शेतकरी व्यक्त करत आहेत.
या घोटाळ्याचा पुढील तपास कसा होतो आणि शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी उचललेला मुद्दा फक्त बाजार समितीपुरता मर्यादित नसून शेतकरी वर्गाच्या भवितव्याशी जोडलेला असल्याने येत्या काही दिवसांत या प्रकरणाला अधिक राजकीय रंग चढण्याची शक्यता नाकारता येत नाही.