Pune News : ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन; आयुष्यभर विजेशिवाय राहिलेले अद्वितीय व्यक्तिमत्व
ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन; आयुष्यभर विजेशिवाय राहिलेले अद्वितीय व्यक्तिमत्व
पुण्यातील ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन. विजेशिवाय साधे आणि निसर्गाशी एकरूप जीवन जगत त्यांनी वनस्पतीशास्त्रासह विविध विषयांवर 30 हून अधिक पुस्तके लिहिली.
सायली मेमाणे
पुणे १९ सप्टेंबर २०२५ : पुणे : वनस्पतीशास्त्र क्षेत्रातील मानाचे नाव असलेल्या ज्येष्ठ विदुषी डॉ. हेमा साने यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. पर्यावरण संवर्धन आणि साधेपणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या संशोधिकेचे जीवन तितकेच विलक्षण होते. मध्यवर्ती पुण्यात राहत असूनही त्यांनी आपल्या आयुष्यभर घरात विजेचे कनेक्शन घेतले नाही. आधुनिक साधनसंपत्ती आणि सुखसोयींपासून दूर राहूनही त्यांनी संशोधन आणि लेखन या क्षेत्रात अपूर्व कामगिरी केली.
13 मार्च 1940 रोजी जन्मलेल्या डॉ. साने यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. तसेच भारतीय विद्या शास्त्रात एम.ए. आणि एम.फिलपर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्य केले आणि तेथून सेवानिवृत्त झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या डॉ. साने यांनी शैक्षणिक क्षेत्रातही एक वेगळी छाप सोडली.
पुण्यातील जोगेश्वरी मंदिराजवळील एका पडक्या वाड्यात त्यांचे वास्तव्य होते. घरात त्यांनी वीज कधीच घेतली नाही. आधुनिक साधने जसे की टीव्ही, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर, मोबाईल यांचा वापर त्यांनी केला नाही. त्यांच्या मते निसर्गाशी एकरूप जीवन जगणेच हे खरे समाधान होते. वाड्यात त्यांच्यासोबत चार मांजरे, एक मुंगूस, एक घुबड आणि पक्षी हेच त्यांचे कुटुंब होते.
त्यांच्या जीवनशैलीत साधेपणा आणि शिस्त होती. नोकरीच्या काळात शेवटची दहा वर्षे त्यांनी ‘लुना’ हे वाहन वापरले, त्याआधी आणि त्यानंतर बहुतेक सर्व प्रवास त्यांनी पायीच केला. वाड्यातील विहिरीचे पाणीच त्यांनी आयुष्यभर वापरले. दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या उजेडात त्यांनी अभ्यास आणि लेखनाची परंपरा सुरू ठेवली. अलीकडील काही वर्षांमध्ये त्यांनी केवळ सौरऊर्जेवर चालणारा दिवा वापरायला सुरुवात केली होती.
साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. वनस्पतीशास्त्र, पर्यावरण, इतिहास आणि प्राच्यविद्या या विषयांवर त्यांनी एकूण 30 हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या लेखनात संशोधनाची खोली आणि निसर्गावरील प्रेम स्पष्ट जाणवते. त्यामुळे त्यांना वनस्पतीशास्त्र क्षेत्रातील ‘एनसायक्लोपिडिया’ म्हणून ओळखले जात होते.
त्यांचे व्यक्तिमत्व अनेकांसाठी प्रेरणादायी होते. साध्या जीवनातूनही किती मोठे कार्य करता येते हे त्यांनी दाखवून दिले. विजेशिवाय आयुष्य काढत त्यांनी पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा संदेश दिला. आधुनिक सुखसोयींपासून दूर राहूनही त्यांनी ज्ञान आणि शिस्त याच्या आधारावर समाजाला मोठी देणगी दिली.
आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक, पर्यावरणीय आणि सामाजिक क्षेत्राने एक मोठे व्यक्तिमत्व गमावले आहे. विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि संशोधक यांच्यासाठी त्यांचे जीवन हे सदैव मार्गदर्शक राहील.