Raj Thackeray Marathi Morcha: ६ जुलैला गिरगावातून मराठीसाठी भव्य मोर्चा; “सरकारचा कट आहे” – राज ठाकरे
६ जुलैला गिरगावातून मराठीसाठी भव्य मोर्चा; “सरकारचा कट आहे” – राज ठाकरे
राज ठाकरे यांनी सरकारच्या भाषाधोरणाचा निषेध करत ६ जुलै रोजी गिरगाव येथून ‘मराठीसाठी’ भव्य मोर्चाची घोषणा केली. कोणताही झेंडा नाही, केवळ मराठीचा अजेंडा.
सायली मेमाणे
२६ जून २०२५ : महाराष्ट्रात नव्याने लागू होणाऱ्या शालेय अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा पेटलेला असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर थेट हल्ला चढवला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सरकारची भूमिका आम्हाला मान्य नाही आणि ती पूर्णतः फेटाळून लावतो.”
ही भेट राजकीय सौजन्य म्हणून झाली असली, तरी ठोस भूमिका न घेता केलेल्या सरकारी प्रयत्नांना राज ठाकरे यांनी पूर्णतः नाकारलं आहे. सरकारच्या प्रस्तावित भाषाधोरणामध्ये इयत्ता पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याच्या योजनेवर मनसेने जोरदार विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “NEP (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण) राज्यांवर लादले जात नाही, मग महाराष्ट्रातच अशी सक्ती का?”
राज ठाकरे यांनी आरोप केला की, सीबीएसई शाळांचे वर्चस्व निर्माण करत हिंदीसह इतर भाषांचा प्रसार हा ठरवून केलेला कट आहे. “ही शाळा मूळतः आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या होत्या, पण आता त्या राज्याच्या मातृभाषेला दूर सारत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका करत म्हटलं, “हे मराठीपण घालवण्याचा कट आहे.”
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून ‘मराठीसाठी’ भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. “हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा किंवा झेंड्याचा नसेल, केवळ मराठी माणसाचा असेल. सकाळी १० वाजता गिरगावहून सुरू होऊन हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचेल,” असं ठाकरे म्हणाले.
या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं असून, “कोण येतंय हे मला बघायचंय आणि कोण येत नाही हेही बघायचंय,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला. मोर्चात कोणते सिने कलाकार सहभागी होणार आहेत यावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “मी बोलल्यानंतर ते येतील. माझं त्यांच्याशी बोलणं सुरू आहे.”
राज ठाकरे यांनी असेही म्हटलं की, “मुलांना भाषा शिकवू नका असे नाही, पण ती लादू नका. मुलांना तंत्रज्ञान, स्विमिंग, स्किल्स याकडे वळवा.” त्यांनी विठोबा दर्शनाचं उदाहरण देत सांगितलं की, “विठ्ठलाकडे साकडे घाला, पण मराठी भाषा विसरू नका.”
हा मोर्चा केवळ भाषेचा नाही, तर मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, हे स्पष्ट करत ठाकरे यांनी समस्त मराठी बांधवांना या लढ्याची हाक दिली आहे.