तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून संजय शिरसाठ यांची हकालपट्टीची मागणी तीव्र

0
तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून संजय शिरसाठ यांची हकालपट्टीची मागणी तीव्र

तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून संजय शिरसाठ यांची हकालपट्टीची मागणी तीव्र

तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करण्याची मागणी तृतीयपंथी संघटनांकडून जोर धरत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे संकेत.

सायली मेमाणे

पुणे १९ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्रातील तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून सध्याचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी तृतीयपंथी संघटनांकडून जोरदारपणे करण्यात येत आहे. या मागणीमुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात नवे वादंग निर्माण झाले आहे. तृतीयपंथी समुदायाचा असा ठाम मुद्दा आहे की, जसे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक महिला नेमली जाते, त्याच धर्तीवर तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदी तृतीयपंथी व्यक्तीची नेमणूक व्हायला हवी.

तृतीयपंथी संघटनांचे मत आहे की, या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट तृतीयपंथी समाजाच्या समस्यांचे निराकरण करणे, कल्याणकारी योजना राबवणे आणि त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे हे आहे. त्यामुळे या पदावर एक तृतीयपंथी व्यक्तीच असावी, ज्याला प्रत्यक्ष अनुभव आहे आणि जो समाजातील समस्यांना जवळून ओळखतो. सध्या अध्यक्षपदी असलेल्या संजय शिरसाठ हे तृतीयपंथी नाहीत, असा मुद्दा संघटनांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाचे सदस्य ऍडव्होकेट पवन यादव यांनी ठामपणे भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकतर अध्यक्षपदी तृतीयपंथी व्यक्तीची तात्काळ नेमणूक करावी किंवा संजय शिरसाठ यांनी स्वतःला तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा त्यांची तातडीने हकालपट्टी करावी.

येत्या मंगळवारी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औपचारिक निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही पवन यादव यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय अधिक गाजण्याची शक्यता आहे.

तृतीयपंथी समुदायाचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांत तृतीयपंथी समाजाने आपली ओळख, हक्क आणि सन्मानासाठी लढा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील तृतीयपंथीयांना समान हक्क आणि सन्मान मिळावा असे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत कल्याणकारी महामंडळासारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी तृतीयपंथी व्यक्ती नसणे हे अन्यायकारक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

या मागणीमुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जर संजय शिरसाठ यांना पदावर कायम ठेवले तर तृतीयपंथी संघटनांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या हकालपट्टीनंतर पुढील अध्यक्षपदी कोणाची नेमणूक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्याच्या घडीला तृतीयपंथी समाजाच्या प्रतिनिधींनी आपले मुद्दे अधिक ठामपणे मांडले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *