Sindhudurg News: देवगडच्या मिठमुंबरी समुद्रकिनारी दुर्घटना; मुंबईतील तरुण पाण्यात बुडाला, तिघांना मच्छिमारांनी वाचवले

0
Sindhudurg News: देवगडच्या मिठमुंबरी समुद्रकिनारी दुर्घटना; मुंबईतील तरुण पाण्यात बुडाला, तिघांना मच्छिमारांनी वाचवले

Sindhudurg News: देवगडच्या मिठमुंबरी समुद्रकिनारी दुर्घटना; मुंबईतील तरुण पाण्यात बुडाला, तिघांना मच्छिमारांनी वाचवले

सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला, तर तिघांना स्थानिक मच्छिमारांनी थरारक बचाव मोहिमेत वाचवले.

पुणे २५ मे २०२६ : Devgad तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी रविवारी संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून, मुंबईहून फिरण्यासाठी आलेल्या तरुणांपैकी एक जण समुद्रात बुडाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक मच्छिमारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तिघा तरुणांचे प्राण वाचवण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य राजेंद्र गुरव (22) असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सोहम जयेश मंडोद (20) याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेही मुंबईतील दादर-नायगाव परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळावरील माहितीनुसार, मूळ देवगडमधील ब्राम्हणदेववाडी येथील रहिवासी आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेला यश राजेंद्र उपरकर आपल्या मित्रांसोबत सुट्टीसाठी गावी आला होता. त्याच्यासोबत ओम दीपक चव्हाण, चैतन्य गुरव, सोहम मंडोद आणि अर्णव तारी हे मित्र देखील आले होते. रविवारी सायंकाळी हे सर्वजण मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते.

यावेळी यश उपरकर किनाऱ्यावर थांबला होता, तर उर्वरित चौघेजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही क्षणांतच चौघेही पाण्यात बुडू लागले. त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र समुद्रातील परिस्थिती अधिकच धोकादायक बनत गेली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार रमेश तारी, लक्ष्मण तारी, मनीष तारी, बाबुराव धुरी आणि बाळा राजम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बाबुराव धुरी आणि बाळा राजम यांनी नौकेच्या सहाय्याने समुद्रात जाऊन बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओम चव्हाण, सोहम मंडोद आणि अर्णव तारी यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. यातील सोहम मंडोद हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला आणि त्यानंतर त्याला शुद्ध आली.

मात्र, यादरम्यान चैतन्य गुरव हा समुद्रात दिसेनासा झाला. त्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी नौकांच्या सहाय्याने त्याचा शोध सुरू केला. सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती, मात्र तो सापडला नसल्याची माहिती देण्यात आली. चैतन्यला चांगले पोहता येत होते, तरीही ही दुर्घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, उपनिरीक्षक प्रवीण सावंत आणि पोलीस कर्मचारी प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सध्या पर्यटन हंगामामुळे देवगड आणि परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, अनेक पर्यटकांना समुद्रातील खोली आणि प्रवाहाचा अंदाज नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed