मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास थेट निलंबन; वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारावर कडक निर्बंध
मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास थेट निलंबन; वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारावर कडक निर्बंध
महाराष्ट्रातील वाहतूक पोलीसांनी खाजगी मोबाईल वापरून ई-चलान प्रणालीमध्ये चुकीचे चलान दिल्यास शिस्तभंगाची कारवाई आणि थेट निलंबन होणार, असा आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी जारी केला.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑक्टोबर २०२५ : मुंबई: महाराष्ट्रातील वाहतूक पोलीस विभागाने खाजगी मोबाईल फोनचा वापर करून ई-चलान प्रणालीमध्ये फोटो अपलोड करणे आणि चुकीचे चलान जारी करणे टाळण्यासाठी कडक निर्णय घेतला आहे. अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदार अद्यापही स्वतःच्या मोबाईलद्वारे वाहनांचे फोटो काढून, वास्तविक वेळ न ठेवता, सोयीप्रमाणे ई-चलानमध्ये अपलोड करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाने आदेश जारी केले आहेत की, वाहतूक पोलीस अधिकारी किंवा अंमलदार खाजगी मोबाईलचा वापर फोटो किंवा चित्रीकरणासाठी करू शकणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि थेट निलंबन देखील होऊ शकते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात वाहतूक संघटनांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी तक्रार केली की, काही पोलीस अधिकारी खाजगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढून, सोयीप्रमाणे ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान देतात.
अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांनी स्पष्ट केले की, खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून चलान तयार करणे आढळल्यास संबंधित अधिकारी/अंमलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या आदेशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस ठाण्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
या आदेशामुळे वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित होण्यास मदत होईल आणि मनमानी कारवाई कमी होईल. पोलीस प्रशासनाने ई-चलान प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे वाहनचालकांना देखील फायदा होईल कारण चुकीचे चलान मिळण्याची शक्यता कमी होईल. शासनाच्या या कठोर उपाययोजनांमुळे वाहतूक नियमांचे पालन सुधारेल आणि पोलीस कारभार अधिक पारदर्शक बनेल.