‘…तर टायरमध्ये घालून मारा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बेशिस्त वाहनचालकांना इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बेशिस्त वाहनचालकांना इशारा
बारामतीत बेशिस्त वाहनचालकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दम; “कोणीही असो, नियम मोडल्यास टायरमध्ये घालून झोडा” असे रोखठोक वक्तव्य.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : बारामती परिसरातील बेशिस्त वाहनचालक, अनधिकृत पार्किंग करणारे आणि सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट इशारा दिला आहे. “जे कोणी नियम मोडतील, कितीही मोठ्या घरातले असले तरी, त्यांना टायरमध्ये घालून झोडा, जेणेकरून त्यांना दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, “मी जे काही करतो ते केवळ माझ्या बारामतीकरांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी करतो. मी शहरात अनेक ठिकाणी झाडं लावली, बसण्यासाठी जागा निर्माण केली. मात्र काही लोक अशा जागा वापरण्याऐवजी मोटरसायकल आत नेऊन निवांत बसून गप्पा मारतात. काहीजण रॉंग साईडने वाहन चालवतात. अशा बेशिस्त वागणुकीला आता मुळीच जागा नाही.”
पवार यांनी सांगितले की, “अजिबात नियम कोणीही तोडू नका, मग तो अजित पवार असो किंवा माझा नातेवाईक असो, नियम सर्वांसाठी सारखे आहेत.” त्यांनी स्पष्ट केलं की कायदा मोडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, आणि अशा व्यक्तींवर कठोर कारवाई होईल.
ते पुढे म्हणाले की, अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकणे, जनावरे मुक्त सोडणे हे प्रकार सुरूच ठेवले आहेत. “अशा जनावरांना जर कोंडवड्यात नेलं तर ठीकच, नाहीतर त्यांना बाजार दाखवावा लागेल. त्यांच्या मालकांवरही कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या वक्तव्यादरम्यान पवारांनी जनावरांच्या मालकांना इशारा देताना सांगितले, “ज्यांच्याकडे गाढव, गाई आहेत, त्यांनी ती जनावरे आपापल्या दारात नीट बांधून ठेवावीत. बारामती मी सुंदर करत आहे, पण ती सर्वांसाठी मुक्तपणे भटकंती करण्यासाठी नव्हे.”
या भाषणामुळे स्थानिक प्रशासनाकडून शिस्तीचा संकेत मिळाला असून सार्वजनिक जागांचा विनाश टाळण्यासाठी पोलिसांकडून अधिक कडक उपाय अपेक्षित आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी आपले मत ठामपणे मांडत स्थानिक नागरिकांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.