मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: १७ वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त, एनआयए विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: १७ वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त, विशेष न्यायालयाचा निकाल
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आज विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा अखेर निकाल; साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांसह सात जणांना मोठा दिलासा.
सायली मेमाणे
पुणे ३१ जुलै २०२५ : मुंबई – २९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आज विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. गेल्या १७ वर्षांपासून चालू असलेल्या या खटल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी व इतर सात जणांवर दहशतवादी कारवायांचा आरोप ठेवण्यात आला होता. सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसने तपास हाती घेतला, तर २०११ मध्ये हा तपास एनआयएकडे हस्तांतरित झाला. खटल्यात ३२३ साक्षीदारांची चौकशी झाली; मात्र ३७ साक्षीदारांनी नंतर जबाब फिरवला
विशेष सरकारी वकिलांनी आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी केली होती. मात्र, पुराव्यांअभावी ही मागणी फेटाळून सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष घोषित केले. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, आरोपींवर युपीए (UAPA) लागू करणे योग्य नव्हते, असे ठरवण्यात आले. तसेच, स्फोटासाठी वापरलेली दुचाकी साध्वी प्रज्ञासिंह यांची असल्याचा एटीएसने दावा केला असला तरी, त्या संदर्भातील पुरावे थिजलेले असल्याचे ठरले
या निकालामुळे तपास एजन्सीज आणि सरकारी आरोपांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मन:स्वास्थ्य ढळले असले तरी, निकालामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायप्रक्रियेतील विलंब, अनेक साक्षीदारांचा जबाब फिरवणे, आणि कागदोपत्री त्रुटीमुळे १७ वर्षांनंतर हा निकाल लागला