२०२६ पासून CBSE दहावीचे दोन बोर्ड परीक्षा! फेब्रुवारीत अनिवार्य, मेमध्ये संधी परीक्षेचा पर्याय
२०२६ पासून CBSE दहावीचे दोन बोर्ड परीक्षा!
२०२६ पासून CBSE दहावीच्या दोन परीक्षा – फेब्रुवारीत अनिवार्य, मेमध्ये स्कोअर सुधारण्यासाठी संधी; परीक्षा दडपण कमी करण्याचा नवा निर्णय.
सायली मेमाणे
२६ जून २०२५ : CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार असून, पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात अनिवार्य असेल तर दुसरी परीक्षा मेमध्ये स्कोअर सुधारणा किंवा कंपार्टमेंट विद्यार्थ्यांसाठी पर्यायी असेल. ही घोषणा CBSE ने २५ जून २०२५ रोजी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे केली.
हा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० च्या शिफारशींनुसार घेण्यात आला असून विद्यार्थ्यांवर येणाऱ्या परीक्षेच्या मानसिक तणावाला कमी करणे, स्कोअर सुधारण्यासाठी दुसरी संधी देणे आणि सतत शिकण्यास चालना देणे हा मुख्य उद्देश आहे.
CBSE च्या या नव्या प्रणालीनुसार, प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्या म्हणजेच फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसणे बंधनकारक असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला स्कोअर सुधारायचा असेल किंवा तो तीन विषयांपर्यंत नापास झाल्यास, त्याला मे महिन्यातील दुसऱ्या परीक्षेत बसता येईल.
या दोन परीक्षांमध्ये अंतर्गत मूल्यमापन (Internal Assessment) केवळ एकदाच घेतले जाईल आणि ते फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्यात येईल. फेब्रुवारी परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये तर मे परीक्षेचा निकाल जूनमध्ये लागेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पुढील अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येईल.
CBSE च्या या नव्या धोरणामुळे विविध विद्यार्थ्यांच्या गटांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडाप्रसंगांमध्ये सहभागी असलेले विद्यार्थी, हिवाळ्यात बंद होणाऱ्या शाळांतील विद्यार्थी तसेच CWSN (Divyang) विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा मुख्य संधी म्हणून देण्यात येणार आहे.
CBSE ने यापुढे modular परीक्षांची, dual-level papers ची आणि objective-descriptive papers ची शक्यता असल्याचेही संकेत दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांचे स्वरूप अधिक लवचिक आणि प्रभावी वाटेल.
सध्या तरी ही योजना केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षांसाठीही भविष्यात अशीच प्रणाली विचाराधीन असून, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
एकूणच, CBSE चा हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी “दोन परीक्षांमध्ये एकच यशाचा मार्ग” तयार करणार आहे. शिक्षणात सुधारणा, आत्मविश्वासात वाढ आणि अपयशावर मात करण्यासाठी दुसरी संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.