आषाढी वारी 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावर विशेष सुरक्षा, DySP दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

आषाढी वारी 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावर विशेष सुरक्षा, DySP दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू, आळंदी आणि सासवड येथील पालखी मार्गांवरील रस्ते, आरोग्य, पाणी व सुरक्षा सुविधांसाठी प्रशासन सज्ज. DySP दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती, 180 CCTV, रुग्णवाहिका व पायाभूत कामांना वेग.
पुणे २५ एप्रिल २०२६ : आषाढी वारी जवळ येत असताना देहू, आळंदी आणि सासवड येथून प्रस्थान करणाऱ्या पालखी सोहळ्यांच्या तयारीला वेग आला आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यंदा सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पाऊल उचलत DySP दर्जाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे, ज्यामुळे पोलिस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका आणि इतर विभागांमध्ये तत्काळ समन्वय साधता येणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत पालखी मार्गांवरील रस्ते, मुक्कामस्थळे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी मार्गांवरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
देहूतील इनामदार वाडा परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील खराब रस्त्यांची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मार्फत केली जाणार आहे. तसेच आकुर्डी परिसरातील मेट्रो कामे आणि रस्त्यांची दुरुस्ती पालखी आगमनापूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही संबंधित यंत्रणांनी दिली आहे. लोणी काळभोर येथे वारकऱ्यांसाठी यंदा जर्मन हँगर, मुबलक पाणी आणि विस्तृत स्वच्छता व्यवस्था उभारली जाणार आहे.
आळंदीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता ‘स्काय वॉक’च्या धर्तीवर नवीन भक्ती सोपान पुलाची उंची वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच दर्शन बारीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचाही विचार सुरू आहे. सुरक्षिततेसाठी आळंदी परिसरात सुमारे १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दिवे घाट परिसरात बॅरेकेटिंग आणि प्रकाशयोजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून केली जाणार आहे.
आरोग्य सुविधांवरही विशेष भर देण्यात आला आहे. पालखी सोहळ्यादरम्यान आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज संस्थानांना प्रत्येकी एक स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच सासवड आणि लोणी काळभोर परिसरात तात्पुरत्या आरोग्य केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. वारकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नीरा नदीत पालखी आगमनाच्या दोन दिवस आधी पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत.
पालखी सोहळा हा जगातील अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीमय सोहळा मानला जातो. लाखो वारकरी अनेक किलोमीटर पायी चालत या परंपरेत सहभागी होतात. त्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा यांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून वेळेत कामे पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. यंदाची वारी अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुविधायुक्त व्हावी, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare