ठाकरे घराण्याची नवी एकजूट! आदित्य ठाकरे यांनी शेअर केला फॅमिली फोटो; सोशल मीडियावर चर्चेचा विषय
ठाकरे घराण्याची नवी एकजूट! आदित्य ठाकरे यांनी शेअर केला फॅमिली फोटो
आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाचा नवा फॅमिली फोटो शेअर करत एकजुटीचा संदेश दिला. उद्धव आणि राज ठाकरे कुटुंबांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सायली मेमाणे
पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे घराण्याचे स्थान नेहमीच विशेष राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांमधील मतभेद आणि राजकीय दुरावा चर्चेत होता. मात्र, आता ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला “फॅमिली फोटो” सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या फोटोनं ठाकरे कुटुंबाच्या नव्या एकतेची साक्ष दिली आहे.
या फोटोत आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांचे लहान भाऊ तेजस ठाकरे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि पत्नी मिताली ठाकरे तसेच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे एकत्र दिसत आहेत. ठाकरे घराण्याच्या पुढच्या पिढीचा हा एकत्र फोटो पाहून अनेकांनी “नवा ठाकरे परिवार – एकत्र आणि मजबूत” असे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.
ही एकजूट केवळ फोटोंपुरती नाही, तर अलीकडील काही घटनांमधून ठाकरे बंधूंचं कौटुंबिक जवळीक वाढत असल्याचेही दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते, तसेच मतचोरीच्या मुद्द्यावर दोन्ही भावांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती. या भेटींमुळे दोन्ही घराण्यांमधील तणाव कमी होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या “दीपोत्सव” कार्यक्रमात उद्धव ठाकरे कुटुंबासह सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर उद्धव कुटुंब दादरमधील राज ठाकरेंच्या घरी गेले होते. यामुळे दोन्ही कुटुंबांची जवळीक अधिक दृढ झाल्याचं स्पष्ट झालं.
ठाकरे घराण्याच्या या नव्या एकतेचा फोटो सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला असून, चाहत्यांनी “ही ठाकरे घराण्याच्या एकतेची नवी सुरुवात” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, या कौटुंबिक एकजुटीमुळे राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो. ठाकरे बंधूंची एकता ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित न राहता, राज्याच्या राजकारणातही नवा अध्याय सुरू करू शकते, अशी चर्चा सध्या रंगली आहे.