ठाण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई; 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त
ठाण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई; 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त
ठाण्यात पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. राजस्थानातील तस्कर सुमित कुमावतला अटक करून तब्बल 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त.
सायली मेमाणे
पुणे ३० ऑगस्ट २०२५ : ठाणे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा आघात केला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हायब्रीड गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश करत तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात राजस्थानच्या जैसलमेर येथील मूळ रहिवासी सुमित कुमावत याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडून दोन किलो 374 ग्राम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारातील किंमत तब्बल दोन कोटी 37 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे आणि मुंबई परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. मेफेड्रोन, कोकेन, चरस आणि गांजा यानंतर आता हायब्रीड गांजाची मागणी वाढत असल्याने तस्करांनी नवे मार्ग अवलंबले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांचे जाळे उध्वस्त झाले असून पोलीस सूत्रांच्या मते या मागे मोठे सिंडिकेट कार्यरत असल्याचा संशय आहे.
हायब्रीड गांजा हे अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेले अंमली पदार्थ असून त्याचे व्यसन लवकर लागते. त्यामुळे तरुणाई या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाढते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेला आरोपी सुमित कुमावत हा गेल्या काही महिन्यांपासून ठाणे परिसरात हायब्रीड गांजाची तस्करी करत होता. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून जाळे रचले आणि त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील प्राथमिक तपासात आरोपीचा मोठ्या अमली पदार्थ तस्करी सिंडिकेटशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या कारवाईनंतर आरोपीकडून माहिती घेऊन पुढील तपास करत आहेत. या प्रकरणामुळे केवळ ठाणेच नव्हे तर संपूर्ण मुंबई परिसरातील अंमली पदार्थांच्या जाळ्याविषयी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या घटनांमुळे समाजातील वातावरण दूषित होत असून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात याच्या आहारी जात आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई समाजासाठी सकारात्मक ठरली आहे. या धडक मोहिमेमुळे तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. पोलिसांच्या मते अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात लवकरच आणखी मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
या कारवाईनंतर ठाणे गुन्हे शाखेची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंमली पदार्थांच्या सिंडिकेटचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्याचे चांगले परिणाम मिळत आहेत. तरुणाईला नष्ट करणाऱ्या या धोकादायक पदार्थाविरुद्ध कठोर कारवाई करणे हेच काळाचे मागणी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.