रुग्णालयांवरील उपचार दावे महिन्यातच भरण्याची व्यवस्था – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
रुग्णालयांवरील उपचार दावे महिन्यातच भरण्याची व्यवस्था – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
पुणे: आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत रुग्णालयांना उपचार दावे (Claims) मागणीनंतर त्याच महिन्यात भरण्याची व्यवस्था; १०८ रुग्णवाहिका आणि रुग्णालयांसाठी प्रोत्साहनरक्कम.
सायली मेमाणे
पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : पुणे – राज्यातील एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत रुग्णालयांना रुग्णावर उपचार केल्यानंतर दावे (Claims) मागणीस सादर केल्यास त्याच महिन्यात दाव्याची रक्कम भरण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे. तसेच, रुग्णालयांच्या मागणीप्रमाणे आगामी काळात उपचार पॅकेजमध्ये वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे – जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळ्यात मंत्री आबिटकर बोलत होते. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद जगताप आदी उपस्थित होते.
मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करणे हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा स्वप्न आहे. तसेच, राज्यातील प्रत्येक रुग्णालयातून उच्च दर्जाची सेवा मिळावी आणि महाराष्ट्र ‘आरोग्य सेवेत सर्वोत्तम’ राज्य म्हणून प्रस्थापित व्हावे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अपेक्षा आहे.
राज्यातील गरजू रुग्णांना या योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्य शासन आणि रुग्णालये मिळून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत, जेणेकरून कोणताही रुग्ण आरोग्यसेवेतून वंचित राहणार नाही.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत रुग्णालयांना मिळणाऱ्या रकमेतील ८०% रक्कम थेट रुग्णालयासाठी तर २०% रक्कम राखीव निधीसाठी ठेवण्याचा निर्णय झाला आहे. यामधून पुढील शस्त्रक्रियेकरिता रुग्णालयांना उपयोग करता येईल. राज्य शासनाकडून १०८ क्रमांकाच्या २५० रुग्णवाहिका लवकरच नागरिकांच्या सेवेस उपलब्ध केल्या जाणार आहेत, ज्या शासकीय तसेच योजनेशी संलग्न रुग्णालयांकरिता वापरल्या जातील.
मंत्री आबिटकर यांनी आशा कार्यकर्त्या, स्वस्त धान्य दुकान चालकांसाठी प्रोत्साहनरक्कम वाढवून ५ रुपये ऐवजी ३० रुपये करण्याची घोषणा केली. यामुळे आयुष्मान भारत कार्ड १०० टक्के गतीने काढले जाऊ शकतील आणि प्रत्येक नागरिक रुग्णालयांशी संलग्न होईल.
राज्य शासनाने रुग्णालयांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यामुळे रुग्णालयांनी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर द्यावा. आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावे, आवश्यक पायाभूत आरोग्य सुविधा उभाराव्यात, असेही मंत्री आबिटकर म्हणाले.
राज्यातील २,४७३ रुग्णालये या योजनेत समाविष्ट असून प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचार देखील या योजनेत येतील. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची प्रणाली अंगीकृत रुग्णालयांवर लागू होईल आणि उपचार पारदर्शक पद्धतीने करण्यात येतील.
कार्यक्रमात रुग्णालय प्रतिनिधी, आरोग्य मित्र, आशा कार्यकर्त्या, स्वस्त धान्य दुकान चालक, आपले सरकार सेवा केंद्र कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. यामुळे आरोग्य सेवावृत्तींचा सन्मान झाला आणि योजनेच्या अंमलबजावणीतील जबाबदारी वाढण्याचे आवाहन करण्यात आले.