श्री चंद्रशेखर होणार मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश? सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमची शिफारस
श्री चंद्रशेखर होणार मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश? सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमची शिफारस
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. विद्यमान मुख्य न्यायाधीश आलोका आराधे एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणार आहेत.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : मुंबई : भारतीय न्यायव्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोका आराधे हे एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणार असल्यामुळे त्यांच्या जागी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा जन्म २५ मे १९६५ रोजी झाला. त्यांनी १९९३ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएल.बी. पदवी मिळवली. त्याच वर्षी त्यांनी दिल्ली राज्य बार कौन्सिलमध्ये वकिलीला सुरुवात केली. तब्बल १९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे ३,५०० प्रकरणांमध्ये वकिली केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या १४० हून अधिक निर्णयांमध्ये त्यांनी वकिली केली आहे. तसेच झारखंड राज्य, एआयसीटीई, बिहार राज्य गृहनिर्माण मंडळ आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे स्थायी वकील म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
- १७ जानेवारी २०१३ : झारखंड उच्च न्यायालय (रांची खंडपीठ) येथे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती
- २७ जून २०१४ : कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून बढती
- डिसेंबर २०२३ : झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश
- डिसेंबर २०२४ : राजस्थान उच्च न्यायालयात बदली
- मे २०२५ : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयात बदलीची शिफारस
- २१ जुलै २०२५ : मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शपथ
सध्या ते मुंबई उच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असून त्यांच्या न्यायिक अनुभवामुळेच कॉलेजियमने त्यांची मुख्य न्यायाधीशपदी शिफारस केली आहे.
भारतीय न्यायव्यवस्थेत विविध राज्यांतील वरिष्ठ न्यायाधीशांची इतर उच्च न्यायालयात बदली करून संस्थात्मक संतुलन राखले जाते. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची शिफारस या परंपरेला अधिक बळकटी देणारी ठरणार आहे.
या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयात सहा अतिरिक्त न्यायाधीशांना कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून मान्यता देण्यात आली. त्यात न्यायमूर्ती संजय आनंदराव देशमुख, न्यायमूर्ती वृषाली विजय जोशी, न्यायमूर्ती अभय जयनारायणजी मंत्री, न्यायमूर्ती श्याम छगनलाल चांडक, न्यायमूर्ती नीरज प्रदीप धोटे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेशन यांचा समावेश आहे. तसेच केरळ उच्च न्यायालयातील तीन अतिरिक्त न्यायाधीशांनाही कायमस्वरूपी करण्याच्या शिफारशीस मान्यता देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाला एक अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले मुख्य न्यायाधीश लाभतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.