Navi Mumbai Food Safety: नवी मुंबईत पावाऐवजी आळ्यांची लादी विकली; बेलापूरमध्ये धक्कादायक घटना
नवी मुंबईत पावाऐवजी आळ्यांची लादी विकली; बेलापूरमध्ये धक्कादायक घटना
नवी मुंबई बेलापूरमध्ये धक्कादायक घटना! नागरिकांनी विकत घेतलेल्या पावाच्या लादीत आळ्या आढळल्या. ईडन बेकरीत गंभीर अस्वच्छता, नियमांचे उल्लंघन; युवासेनेने बेकरी बंद करण्याचे दिले निर्देश.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : नवी मुंबईकरांना हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेलापूर सेक्टर 10 मधील अंबिका स्वीट्समधून विकत घेतलेल्या नरम पावाच्या लादीत आळ्या आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची तक्रार साबळे आणि वागळे कुटुंबीयांनी केली असून, ही माहिती समजताच परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले.
सदर प्रकरणाची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेना बेलापूर विधानसभा चिटणीस ॲड. साईश जाधव यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पावाचा पुरवठा करणाऱ्या ईडन बेकरी, सेक्टर 36, करावे गाव, सीवूड्स येथे पाहणी केली. या तपासणीत धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या.
बेकरीमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी आणि गंभीर स्वच्छतेचे उल्लंघन दिसून आले. याशिवाय बेकरीमध्ये परवाना नसलेले आणि बेकायदेशीर कामगार काम करत असल्याचे उघड झाले. हायजिनच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर कामगार बेकरी परिसरातच गुटखा, सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करत असल्याचेही निदर्शनास आले.
या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होत आहे. आळ्या असलेली लादी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचली यावरून तपासणी यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारे अस्वच्छ वातावरणात तयार होणारे खाद्यपदार्थ थेट लोकांच्या पोटात गेल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
युवासेनेच्या टीमने बेकरीला तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आणि दुकानदारांना तंबी दिली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ॲड. साईश जाधव यांनी स्पष्ट केले की, “नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा घटनांविरोधात तातडीने तक्रार करावी, अन्नसुरक्षा हा प्रत्येकाचा अधिकार आहे.”
नवी मुंबईतील नागरिकांनी देखील या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे. पावासारखा दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थ आळ्या असलेल्या लादीच्या स्वरूपात विकला गेला, ही गोष्ट अत्यंत चिंताजनक असल्याचे नागरिकांनी म्हटले. शहरात अशा अनेक बेकऱ्या योग्य तपासणीशिवाय सुरू असल्याची भीती व्यक्त होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
नवी मुंबईतील बेलापूर परिसरात घडलेला हा प्रकार केवळ एकच घटना नसून, यामधून अन्नसुरक्षा यंत्रणेच्या दुर्लक्षाची झलकही समोर आली आहे. आता या प्रकरणात पुढे काय निर्णय होतो आणि प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.