भारत टॅक्सी सेवा: ओला-उबरच्या मनमानीवर दणका, सुरक्षित आणि वाजवी भाडे
भारत टॅक्सी सेवा: ओला-उबरच्या मनमानीवर दणका, सुरक्षित आणि वाजवी भाडे
भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा, जिथे ड्रायव्हर्सना कमिशन नाही, प्रवाशांना सुरक्षित आणि वाजवी भाडे मिळेल. डिसेंबरपासून दिल्लीत पायलट सुरू, नंतर संपूर्ण भारतात उपलब्ध.
सायली मेमाणे
पुणे २४ ऑक्टोबर २०२५ : भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा असून, ओला आणि उबरच्या मनमानीवर मोठा दणका देण्यास सज्ज आहे. प्रवाशांना अनेकदा खाजगी कॅब अॅप्समुळे त्रास सहन करावा लागतो, जसे की भाडे जास्त आकारणे, कार अस्वच्छ असणे, राईड रद्द होणे आणि सुरक्षा संदर्भातील समस्या. या सर्व तक्रारी दूर करण्यासाठी भारत सरकारने भारत टॅक्सी ही सेवा सुरू केली आहे. ही सेवा डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे, मात्र नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये पायलट प्रोजेक्टदेखील सुरू होईल.
पायलटमध्ये सुमारे 650 चालक आणि वाहन मालक सहभागी होतील. भारत टॅक्सीमध्ये ड्रायव्हर्सना कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही, त्यामुळे ते संपूर्ण उत्पन्न स्वतःच्या खिशात घेतील. त्यामुळे ओला, उबर किंवा इतर खाजगी कॅब सेवांपेक्षा भारत टॅक्सी अधिक आकर्षक ठरेल. या सेवेत डिसेंबरपासून हळूहळू देशभरात विस्तार केला जाईल. अंदाजे 5000 ड्रायव्हर्स डिसेंबरपर्यंत या सेवेत सामील होतील आणि विविध शहरांमध्ये प्रवाशांना सेवा देतील.
भारत टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी सुरक्षिततेवर विशेष भर देते. कॅबमध्ये एक डिस्ट्रेस बटण ठेवण्यात आले आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत दाबल्यास जवळच्या पोलिस ठाण्याला अलर्ट जाईल. भाडे निश्चित आणि वाजवी ठरवले गेले असून, प्रवाशांना ओला-उबरप्रमाणे अतिरिक्त भाड्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.
ड्रायव्हर्सना कमिशनऐवजी फक्त दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक सबस्क्रिप्शन फी भरावी लागेल, पण प्रत्येक राईडमधून मिळणारी 100% कमाई त्यांना मिळेल. यामध्ये महिला चालक देखील सामील होतील, पहिल्या टप्प्यात 100 महिला चालक सहभागी होतील, आणि 2030 पर्यंत त्यांची संख्या 15,000 पर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.
भारत टॅक्सी ही सहकारी सेवा म्हणून देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक नवा पर्याय उभा करेल आणि प्रवाशांसाठी सुरक्षित, किफायतशीर आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करेल. ओला आणि उबर यांच्यासारख्या खाजगी कंपन्यांसाठी भारत टॅक्सी एक मोठा आव्हान ठरणार आहे, कारण ग्राहकांना कमी भाडे आणि सुरक्षित सेवा मिळणार आहे. भारत टॅक्सी देशभरात वाढत जाणा-या सहकारी कॅब सेवांचा आदर्श प्रकल्प ठरेल असे पाहायला मिळेल.