जळगावात रेल्वेखाली येऊन मामा-भाच्याचा मृत्यू; रील बनवत होते की कामावर जात होते?

जळगावात रेल्वेखाली येऊन मामा-भाच्याचा मृत्यू; रील बनवत होते की कामावर जात होते?
जळगावच्या पाळधी स्थानकाजवळ अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसखाली दोन तरुणांचा मृत्यू झाला. मामा-भाच्याच्या नात्यातील हे दोघे रील बनवत होते की कामासाठी जात होते, यावरून संभ्रम. गावात शोककळा पसरली.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑक्टोबर २०२५ : जळगाव जिल्ह्यातील पाळधी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसखाली दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे असून, एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्या मृत्यूमुळे पाळधी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना रविवारी सकाळी घडली. मृतांमध्ये प्रशांत पवन खैरनार आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे या दोन तरुणांचा समावेश आहे. रेल्वे लाईनवर मोबाईलवर रील बनवत असताना हे दोघे भरधाव एक्सप्रेसखाली आल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र हे दावे फेटाळले असून, हे दोघे कामावर जात असताना अपघात झाल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे दोन कुटुंबांवर दिवाळीच्या काळात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रशांत आणि हर्षवर्धन हे दोघेही पाळधी गावातील महात्मा फुले नगर परिसरात राहत होते. प्रशांत दहावीला आणि हर्षवर्धन अकरावीला शिक्षण घेत होते. नात्याने मामा-भाचे असले तरी दोघेही समवयस्क असल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री होती. दिवाळीच्या सुट्टीदरम्यान काही काम करून आईला मदत करायची आणि कुटुंबाला भेटवस्तू घ्यायच्या, असा त्यांचा निर्धार होता.
रेल्वे लाईन ओलांडताना मोबाईलवर बोलण्यात गुंग झाल्यामुळे किंवा रेकॉर्डिंग करत असल्यामुळे त्यांना भरधाव एक्सप्रेस येत असल्याचे लक्षात आले नाही, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी एक अँड्रॉइड मोबाईल सापडला आहे. या मोबाईलमुळे रील बनवत होते की काही दुसरे कारण होते, हे स्पष्ट होणार आहे. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
प्रशांत पवन खैरनार हा मूळ मालेगावचा रहिवासी होता. तीन वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याची आई दोन्ही मुलांना घेऊन पाळधी गावात आली आणि तेथे भाड्याच्या घरात राहू लागली. ती स्थानिक दवाखान्यात साफसफाईचे काम करून आपल्या मुलांचे शिक्षण चालवत होती. प्रशांत मोठा होऊन अधिकारी व्हावा, अशी तिची इच्छा होती. पण या घटनेने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे हा पाळधी गावातील रहिवासी होता. त्याचे वडील सफाई कामगार तर आई गृहिणी आहे. हर्षवर्धनला तीन बहिणी आहेत — त्यातील एक विवाहित, एक घटस्फोटीत आणि एक अविवाहित आहे. भाऊबीज साजरी होण्याच्या काही दिवस आधीच या तिन्ही बहिणींनी त्यांचा एकुलता एक भाऊ गमावला. त्यामुळे नन्नवरे कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दोघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण पाळधी गाव शोकाकुल आहे. दोघेही मेहनती, समजूतदार आणि स्वप्न पाहणारे तरुण असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या आईच्या अथक परिश्रमातून उभं राहिलेलं भविष्य क्षणात उद्ध्वस्त झालं. रील बनवताना दुर्लक्ष झालं की हा फक्त एक अपघात होता, हे अजून स्पष्ट नाही. मात्र या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर बेपर्वाईने वावरण्याच्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter