सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम! ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा केला तर होणार शिस्तभंग

सरकारी कार्यालयांत वाढदिवस साजरा केला तर होणार शिस्तभंग
शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यावर आता राज्य सरकारने बंदी घातली आहे. नियम मोडल्यास नोटीस व दंड होणार. वाचा काय आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ चा संदर्भ.
सायली मेमाणे
पुणे ८ जुलै २०२५ : मुंबई – शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरे करण्यास राज्य सरकारने आता बंदी घातली आहे. वैयक्तिक कार्यक्रम, केक कापणे, भाषणं किंवा पार्टीसारखे कार्यक्रम यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा येत असल्याने शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ अंतर्गत यावर कारवाईसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या परिपत्रकात कार्यालयीन वेळेत आणि जागेवर कोणतेही अशासकीय, धार्मिक, सामाजिक वा वैयक्तिक कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला आहे.
शिस्त, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवा हे कर्मचाऱ्यांचे मूलभूत कर्तव्य असल्याने कार्यालयीन वेळ नागरिकांच्या सेवेसाठी आरक्षित असावी, असे शासनाचे स्पष्ट मत आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी आपले वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करत असल्याचे दिसून येते, जेव्हा भाषणांचे सत्र आणि सामूहिक गर्दीमुळे कार्यालयात आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने ही पावले उचलली आहेत.
जमावबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आले असून, यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम हे शिस्तभंग म्हणून समजले जातील. नियम क्रमांक ४, ५ व २२ च्या अनुषंगाने कोणताही कर्मचारी कार्यालयात अनधिकृतपणे वैयक्तिक कार्यक्रम घेत असल्यास त्याच्यावर नोटीस, चौकशी किंवा दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. यामुळे आता शासकीय कार्यालयात वाढदिवस वा इतर वैयक्तिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याआधी दोनदा विचार केला जाणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter