मुंबईत अंधेरीत मॅनहोलच्या चार जाळ्या चोरी; नागरिकांच्या जीवाशी खेळ
मुंबईकरांच्या जीवाशी खेळ! क्षणात रिक्षावाल्याने मॅनहोलच्या जाळ्या केल्या गायब
अंधेरी पश्चिमेत ऑटो रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत चार मॅनहोलच्या जाळ्या चोरल्या. चोरीचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑगस्ट २०२५ : मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंधेरी पश्चिम येथील आराम नगर भागात चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत मॅनहोलच्या चार जाळ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरांनी या सर्व जाळ्या ऑटो रिक्षामध्ये टाकून फरार होताना व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चोरी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली. रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी क्षणात जाळ्या काढल्या आणि काही मिनिटांत घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर @AndheriLOCA या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला असून, त्यानंतर नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
मॅनहोलच्या झाकणांशिवाय रस्त्यावरून पादचारी आणि वाहनचालकांना गंभीर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी हे उघडे मॅनहोल जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने मॅनहोलच्या जाळ्यांची रचना बदलून त्या सहजपणे न काढता येण्याजोग्या बनवाव्यात, अशी मागणी होत आहे.
या चोरीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर झालेच, पण त्याचबरोबर नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या करोडो रुपयांचा अपव्ययही झाल्याचे समजते. मुंबईसारख्या महानगरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. चोरट्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा होणे गरजेचे असल्याचे मत नागरिक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.