• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत; खरीप हंगाम धोक्यात

May 22, 2025
अवकाळी पावसामुळे शेतकरीअवकाळी पावसामुळे शेतकरी

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मशागतीचा खोळंबा झाला असून खरिपातील उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सायली मेमाणे,

२२ मे २०२४ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पावसामुळे सध्या घेतलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, याचा पुढील खरीप हंगामावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात शेतीची पारंपरिक मशागत करून जमिनीत सूर्यप्रकाश देण्याची पद्धत असते. यामुळे जमिनीतील रोगजंतू नष्ट होतात आणि खतांचा प्रभाव चांगला पडतो. मात्र, सलग पावसामुळे नांगरणी, खत टाकणे आणि मातीला विश्रांती देण्यास विलंब होत आहे. परिणामी, खरीप हंगामातील पिकांची वाढ व उत्पादन धोक्यात येण्याची चिन्हं आहेत.

सध्या कांदा, बाजरीसारखी उन्हाळी पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी ही पिके पावसामुळे भिजून गेलेली असून, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. मावळ, वेल्हा, आंबेगाव, हवेलीसारख्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असून, शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरीही सध्याच्या ढगाळ हवामानामुळे चिंतेत आहेत. या पिकांना फळधारणेसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. जर हवामान असेच राहिले, तर उत्पादनात घट होण्याची भीती आहे.

खरीप हंगामातील भात लागवडीसाठी मशागतीची प्रक्रिया आधीच सुरू असते. मात्र, पावसामुळे जमीन भाजता येत नाही आणि त्याचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर होऊ शकतो. उन्हाळी मशागतीनंतर मातीला मिळणाऱ्या उष्णतेमुळे तिची गुणवत्ता सुधारते. रोगकारक घटक नष्ट होतात आणि खतांची कार्यक्षमता वाढते. मात्र, पावसामुळे ही प्रक्रिया खंडित होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचे काही ठिकाणी सकारात्मक परिणामही दिसून येतात. लिंबूवर्गीय फळपिकांना आणि काही उन्हाळी पिकांना या पावसामुळे पाण्याचा पुरवठा चांगला झाल्याने उत्पादनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा एकंदर परिस्थिती पाहता ‘अवकाळी पावसामुळे शेतकरी’ ही चिंता वाढतच चालली आहे.